कोरोना संसर्गावरून सुप्रीम कोर्टाने केंद्र, राज्य सरकारांना फटकारले

कोरोना संसर्गावरून सुप्रीम कोर्टाने केंद्र, राज्य सरकारांना फटकारले

देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. कोरोनामुळे होणार्‍या मृत्यूच्या संख्येतही दरदिवशी वाढ होतेय. त्याचवेळी अनेक ठिकाणी असं दिसतंय की लोक कोरोना संबंधी सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालनही करत नाहीत. लोक सार्वजनिक ठिकाणी गर्दी करतायंत आणि त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी वावरताना लोक मास्कचा वापर करत नाहीत. या सगळ्या घटनांवरून सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे.

देशातील 80 टक्के लोक विना मास्कचे फिरत आहेत. राज्याला आणि केंद्र सरकारला याची चिंता आहे की नाही असाही प्रश्न सुप्रीम कोर्टाने विचारला आहे. तसेच सरकारकडून याबाबत केवळ नियमच केले जातात अशी खरमरीत टीका कोर्टाने केली आहे.

कोरोनाच्या बाबतीत राज्यांच्या भूमिकेवर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. आम्ही इथं सुनावणी घेतोय आणि बाहेर तिकडे 80 टक्के लोक विना मास्कचे फिरतात किंवा मास्क तोंडावर न लावता खाली लटकवत ठेवतात. याबाबत सरकार फक्त नियम बनवत आहे. त्यांच्या पालनाची कुणालाही काळजी नाही. त्यामुळे परिस्थिती आता हाताबाहेर जात आहे.
राज्यांना चिंता नाही, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे परिस्थिती बिघडत आहे. याची कोणतीही चिंता केंद्राला आणि राज्याला नाही असे दिसते. या सुनावणी दरम्यान सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी कोर्टाला सांगितले की, कोरोनाच्या प्रश्नावरून राज्यांनी अधिक कडक पाऊले उचलली पाहिजेत. देशाच्या केवळ 10 राज्यांत 70 टक्के कोरोनाचे रुग्ण आढळतात. यावर कोर्टाने सांगितले की राज्यांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन कोरोनावर गंभीरपणे काम केले पाहिजे.

First Published on: November 28, 2020 7:12 AM
Exit mobile version