कामावरुन काढून टाकल्याच्या रागातून टीम लीडरसह चार जणांवर प्राणघातक हल्ला

कामावरुन काढून टाकल्याच्या रागातून टीम लीडरसह चार जणांवर प्राणघातक हल्ला

मालाड येथे टीम लीडरसह चार सहकार्‍यांवर त्यांच्याच सहकारी मित्राने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात पाचही कर्मचारी जखमी झाले होते. याप्रकरणी हत्येचा प्रयत्नासह अन्य भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंद होताच आरोपी सहकारी कर्मचारी सुजीत नरेंद्र सिंग याला बांगुरनगर पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. कामावरुन काढून टाकल्याच्या रागातून सुजीतने हा हल्ला केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

ही घटना सोमवारी दुपारी सव्वाबारा वाजता मालाड येथील माईडपेस, पाचवा मजल्यावरील कॉल टू कनेक्ट, डायमेंशन कार्यालयात घडली. याच ठिकाणी वृषभ मिलिंद सावंत हे त्याचे चार सहकारी हसन शेख, दिवेश, अथर्व कदम आणि प्रशांत मिश्रायसोबत कामावर आहे. तिथेच सुजीत सिंग हादेखील काम करीत होता, मात्र त्याला कामावरुन काढून टाकण्यात आले होते. त्याचा त्याच्या मनात राग होता. याच रागातून त्याने सोमवारी दुपारी साडेबारा वाजता वृषभ व इतर चार सहकारी कर्मचार्‍यावर पेपर कटरने प्राणघातक हल्ला केला होता.

या हल्ल्यात पाचही कर्मचारी जखमी झाले होते. हल्ल्याची माहिती प्राप्त होताच बांगुरनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी जखमी झालेल्या पाचजणांना पोलिसांनी जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. तिथेच त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले. याप्रकरणी वृषभ सावंत याने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी सहकारी सुजीत सिंग याच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह मारामारी, शिवीगाळ करुन धमकी देणे तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. गुन्हा नोंद होताच त्याला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून गुन्ह्यांतील पेपर कटर पोलिसांनी जप्त केला आहे.


दिल्लीतून १० वर्षांपासून लपून बसलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक, AK-47 सह मोठा शस्त्र साठा जप्त


First Published on: October 12, 2021 8:16 PM
Exit mobile version