तितली वादळाने 12 जणांचा मृत्यू

तितली वादळाने 12 जणांचा मृत्यू

भुवनेश्वर : तितली वादळ आणि मुसळधार पावसामुळे आंध्र प्रदेश आणि ओडिशात हाहाकार माजला आहे. ओडिशातील गजपती जिल्ह्यात दरड कोसळून १२ जणांचा मृत्यू झाला असून ४ जण बेपत्ता आहेत. आंध्र प्रदेशातही आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. ओडिशातच ३ लाख लोकांना वादळाचा फटका बसला आहे. गजपती जिल्ह्यात शुक्रवारी संध्याकाळी मुसळधार पाऊस कोसळत होता. त्यावेळी बरघरा गावातील काही लोकांनी गुंफेत आसरा घेतला होता. त्याचवेळी दरड कोसळून १२ जणांचा मृत्यू झाला. ढिगार्‍याखाली आणखीही काही जण दबले असण्याची शक्यता आहे.

गजपती आणि गंजम जिल्ह्यात वादळाने मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. तितली वादळ ओडिशाची सीमा ओलांडून पश्चिम बंगालमध्ये सरकले आहे. येत्या २४ तासांत पश्चिम बंगालमधील किनारपट्टी भागात सोसाट्याच्या वार्‍यासह पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. नौदलाची दोन हेलिकॉप्टर्स गजपती जिल्ह्यात मदतकार्य करत असून पूरग्रस्तांना फूड पॅकेट्स व अन्य मदत पुरवली जात आहे.

First Published on: October 13, 2018 8:51 PM
Exit mobile version