राममंदिर प्रकरणी २ ऑगस्टपासून दररोज सुनावणी होणार – सुप्रीम कोर्ट

राममंदिर प्रकरणी २ ऑगस्टपासून दररोज सुनावणी होणार – सुप्रीम कोर्ट

अयोध्या राम मंदिरप्रकरणी सुप्रीम कोर्टाने महत्वाचा निर्णय दिला आहे. येत्या २ ऑगस्टपासून दररोज या प्रकरणाची सुनावणी कोर्टात होणार असून ५ न्यायधीशांचे खंडपीठ ही सुनावणी घेणार आहेत. दरम्यान, ३१ जुलैपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने मध्यस्थ समितीला दिले आहे. या प्रकरणावर २ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता खुल्या कोर्टात सुनावणी होणार असून त्यात मध्यस्थ समितीमार्फत या प्रकरणावर तोडगा काढायचा की या प्रकरणावर रोज सुनावणी करायची यावर निर्णय घेण्यात येणार असल्याचे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले.

समितीने वेळ वाढवून मागितली 

याआधी झालेल्या सुनावणीत मध्यस्थ समितीने सर्वसमावेशक आणि संमतीचा तोडगा काढण्यासाठी घटनापीठाकडे आणखी वेळ देण्याची मागणी केली होती. यानंतर सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय घटनापीठाने समितीची मागणी मान्य करताना तीन महिने मुदतवाढ दिली होती. दरम्यान, समितीचा अहवाल बंद पाकिटातून न्यायालयात सादर करण्यात आला. सरन्यायाधिशांनी मध्यस्थी प्रकरणात किती प्रगती झाली हे उघड करणार नसल्याचे सांगितले. ही माहिती गोपनीय असल्याने असल्याने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, अहवालामध्ये काही सकारात्मक बाबी असल्याचे सरन्यायाधीशांनी म्हटले. समितीकडे अंतरिम अहवाल असल्याने त्याला अंतिम स्वरुप देण्यासाठी वेळ वाढवून मागितला होता.

First Published on: July 18, 2019 11:06 AM
Exit mobile version