कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून देशात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यात मुंबईतही कोरोना रुग्णसंख्या अतिवेगाने वाढतेय. मुंबईत काल दिवसभरात २० हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. यात मुंबईतही लॉकडाऊनच्या अफवेमुळे बहुतांश रेल्वे स्थानकांवर मजुरांनी गर्दी केली आहे. तर राजधानी दिल्लीतही काम करणाऱ्या परप्रांतीयांना पुन्हा एकदा लॉकडाऊनची भीती सतावू लागली आहे. दरम्यान दिल्ली वीकेंड लॉकडाऊन, नाईट कर्फ्यू असे निर्बंध लागू केले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्बंध घालण्यात आले आहेत, परंतु लॉकडाऊन लागू होणार नाही, असे सरकार वारंवार सांगत आहे.
दरम्यान दिल्लीत शुक्रवारपासून वीकेंड कर्फ्यू लागू होण्याच्या काही तासांपूर्वीच बसस्थानकावर अन्य राज्यांत जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. दिल्लीतील सराय काले खान, कश्मीरी गेट, आनंद विहार बसस्थानकावरून नागरिकांनी दिल्लीतून बाहेर पडण्याची घाई करत आहे. जेणेकरून संसर्गाची परिस्थिती आणखी बिघडण्यापूर्वी ते गावात पोहोचू शकतील.
दरम्यान मुंबईतही लॉकडाऊनच्या भीतीने दादर, मुंबई सेंट्रल, बोरिवली, अंधेरीसह अनेक रेल्वे स्थानकांवर परप्रांतीय मजुरांनी घरी जाण्यासाठी गर्दी केली आहे. मुंबईत काल एका दिवसात २० हजारांच्यावर रुग्णसंख्या पोहचली आहे. त्यामुळे मुंबईतही आगामी काळात निर्बंध आणखीन कडक होण्याची शक्यता आहे. यात बाजारपेठा, दुकाने, रेल्वे स्थानक परिसरांत गर्दी रोखण्यासाठी निर्बंध लावले जात आहे. यात दिल्लीत दुकाने सम-विषम तत्वावर सुरु करण्यास परवानगी दिली आहे.