लग्नात वधूवर गोळीबार; तरिही लग्न पुर्ण केलंच

लग्नात वधूवर गोळीबार; तरिही लग्न पुर्ण केलंच

भर लग्नात गोळीबार

नवी दिल्लीच्या शाकारपूर येथे भर लग्नात एका ‘वधू’वर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका अज्ञात आरोपीने नवरीवर गोळीबार केला होता. यात नवरी मुलीच्या पायाला गोळी लागली असून जखमी वधूला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आता त्या वधूच्या प्रकृतीला कुठलाही धोका नसल्याचे सांगितल्यानंतर नवरी मुलगी पुन्हा एकदा मंडपात आली आणि तिने विवाहाच्या विधी पूर्ण केल्या आहेत. याप्रकरणी गोळीबाराची पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

कोणी केला गोळीबार

लग्न सोहळ्यात झालेल्या गोळीबाराची तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र गोळीबार कोणी केला ते ठाऊक नाही? असे वधू आणि वराच्या कुटुबियांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले आहे. पोलिसांनी विविध कलमातंर्गत अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र लग्नात गोळीबार होण्याची ही पहिली वेळ नसल्याचे समोर आले आहे.

याआधी देखील घडली होती अशी घटना

याआधी देखील दक्षिण दिल्लीत लग्नाची वरात विवाहस्थळाच्या दिशेना चाललेली असताना दोन आरोपींनी नवऱ्या मुलावर गोळ्या झाडल्या होत्या. या गोळीबारात नवऱ्या मुलाच्या उजव्या हाताला गोळी लागली होती. त्यावेळी सुद्धा तीन तासाच्या उपचारानंतर नवऱ्याने मंडपात परतून विवाहाच्या विधी पूर्ण केले होते.

First Published on: January 18, 2019 4:14 PM
Exit mobile version