‘आप’ला दुसरा जोरदार धक्का!

‘आप’ला दुसरा जोरदार धक्का!

फोटो सौजन्य - India TV

आम आदमी पक्षाला दुसरा धक्का बसला आहे. आशुतोष यांनी राजीनामा दिल्यानंतर आता आशिष खेतान यांनी देखील राजीनामा पक्षनेतृत्वाकडे पाठवला आहे. दरम्यान, यावर बोलायला आशिष खेतान यांनी नकार दिला आहे. सध्या मी राजकारणामध्ये सक्रीय नाही आहे. शिवाय, मला अफवांमध्ये काहीही रस नसल्याचे खेतान यांनी म्हटले आहे. मात्र आशिष खेतान यांचा राजीनामा अद्यापही स्वीकारला गेलेला नाही. यापूर्वी आशुतोष यांनी देखील ‘आप’ला सोडचिठ्ठी दिलेली आहे. त्यानंतर ‘आप’ला बसलेला हा दुसरा धक्का आहे. दरम्यान, दोघांचेही राजीनामे पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी स्वीकारलेले नाहीत.

खेतान यांचे स्पष्टीकरण

दरम्यान, मला माझ्या कामावर लक्ष केंद्रीत करायचे आहे. सध्या मी राजकारणामध्ये कोणत्याही प्रकारे सक्रिय नाही. खेतान पेशाने वकील आहेत. तर राजकीय नाराजीमुळे खेतान यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याची चर्चा सध्या दिल्लीच्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे.

उमेदवारी नाकारल्यामुळे खेतान नाराज

२०१९ साली लोकसभेच्या निवडणुका आहेत. यावेळी नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून ‘आप’च्या वतीनं निवडणूक लढवण्यासाठी आशिष खेतान उत्सुक होते. कारण, २०१४ साली त्यांना भाजपच्या मीनाक्षी लेखी यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र, पक्ष नेतृत्वाकडून त्याबद्दल कोणताही सकारात्मक निर्णय आला नाही. परिणामी नाराज खेतान यांनी पक्षाला रामराम करण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

वाचा – आशुतोष यांचा ‘आप’ला रामराम
First Published on: August 22, 2018 8:03 PM
Exit mobile version