कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत गेली दोन महिने सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा उद्रेक झाल्याचे पहायला मिळत आहे. शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण मिळाले आहे. आज शेतकऱ्यांनी दिल्लीत ट्रॅक्टर रॅली काढली. मात्र या आंदोलनाला हिंसक वळण मिळाले. लाल किल्ला परिसरात शेतकरी आंदोलक नियंत्रणाबाहेर गेल्याचे चित्र पहायला मिळाले. हे हिंसक आंदोल आणखी पेटू नये आणि त्यासंबंधीच्या अफवांना आळा बसावा यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने दिल्लीतील इंटरनेट सेवा बंद करण्याचे आदेश गृहमंत्रालयाकडून देण्यात आले आहेत. आज रात्री १२ वाजेपर्यंत दिल्लीतील इंटरनेट सेवा बंद राहणार आहे.
Internet services snapped in some parts of Delhi-NCR in view of the prevailing law and order situation. pic.twitter.com/5rcHwb27qY
— ANI (@ANI) January 26, 2021
दिल्लीतील आयटीओ परिसरात पोलीस आणि आंदोलक शेतकरी यांच्यातील संघर्ष शिगेला पोहचला. दिल्ली मेट्रोच्या अनेक स्थानकांचे प्रवेश आणि बाहेर येणारे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी आज ट्रॅक्टर रॅली काढली. आंदोलक शेतकऱ्यांकडून पोलीसांच्या अंगावर ट्रॅक्टर चालवण्याचा प्रयत्न करण्यात आला. लाल किल्ल्यांच्या परिसरात आंदोलक शेतकरी तलवार आणि काठ्या घेऊन पोलिसांचा पाठलाग करताना पहायला मिळाले. हि चिघळलेली परिस्थिती लक्षात घेता दिल्लीतील सिंघू बॉर्डर, टिकरी, गाजीपूर बॉर्डर,नांगलोई, मुकरबा चौक परिसरातील इंटरनेट सेवा बंद करण्याचे आदेश गृहमंत्रायलयाकडून देण्यात आले. त्याचप्रमाणे इंडिया गेटकडे जाणारे सर्व रस्तेही बंद करण्यात आले आहेत. राष्ट्रपती भवन आणि पंतप्रधानाच्या निवासाबाहेर कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे.
केंद्र सरकराने लादलेले कृषी कायदे मागे घेण्यासाठी गेली २ महिने दिल्लीत शेतकरी आंदोलन करत आहेत. अनेक बैठकाघेऊनही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मार्ग निघत नाही. आज शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीमधून झालेला हिंसाचार पाहता शेतकरी आंदोलनाला एक हिंसक वळण मिळाले आहे. दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील शेतकरीही मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन करत आहेत. शेतकरी महिलांसह तरुणांनीही या शेतकरी आंदोलनात सहभाग घेतला आहे.
हेही वाचा – दिल्लीत तणाव, शेतकरी आक्रमक, पोलिसांच्या वाहनांवर हल्लाबोल, बंदुकाही हिसकावल्या, बसेस पेटवल्या