घरताज्या घडामोडीदिल्लीत तणाव, शेतकरी आक्रमक, पोलिसांच्या वाहनांवर हल्लाबोल, बंदुकाही हिसकावल्या, बसेस पेटवल्या

दिल्लीत तणाव, शेतकरी आक्रमक, पोलिसांच्या वाहनांवर हल्लाबोल, बंदुकाही हिसकावल्या, बसेस पेटवल्या

Subscribe

देशभरात प्रजासत्ताक दिन साजरा होत असतानाच दिल्लीत मात्र तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स तोडले. नव्या कृषी कायद्याविरोधात आक्रमक झालेले शेतकऱी आज राजधानीत प्रवेश करत असून ट्रॅक्टर मोर्चा काढत शक्तीप्रदर्शन करत आहेत. राजपथावरील संचलनानंतर शेतकऱ्यांना मोर्चा काढण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने अनेक ठिकाणी पोलीस व शेतकरी यांच्यात संघर्ष होत आहे. काही ठिकाणी आंदोलक शेतकऱ्यांनी पोलिसांच्या वाहनांवर हल्लाबोल करत त्यांच्या हातातून बंदुका हिसकावल्या. यामुळे आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांना हुसकावण्यासाठी पोलिसांना लाठीचार्जबरोबरच अश्रूधूराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या.

दिल्ली व हरयाणाच्या तिकरी सीमेवर शेतकरी मोठ्या संख्येने ट्रॅक्टरसह दाखल झाले आहेत. हे शेतकरी किसान मजदूर संघर्ष समितीचे आहेत. दुपारी १२ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मोर्चास परवानगी देण्यात आली आहे. मात्र सकाळपासूनच शेतकरी आपल्या ट्रॅक्टरसह य़ेथे धडकू लागल्याने पोलिसही सावध झाले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून हे शेतकरी नव्या कृषी कायद्याविरोधात आंदोलन करत आहेत. २६ जानेवारीला प्रजासत्ताकदिनी शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे संपूर्ण देशाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

दिल्लीच्या दिशेने निघालेले शेतकरी आक्रमक झाले असून गाझीपूर सीमेवर पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स शेतकऱ्यांनी तोडले. यामुळे मोठ्या संख्येने पोलिसांच्या दिशेने येणाऱ्या या शेतकरी जमावाला रोखण्यासाठी पोलिसांना अश्रूधूराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. पोलिसांच्या या कारवाईमुळे आंदोलनकर्ते अधिकच चिडले आहेत. तर दुसरीकडे सिंघु सीमेवरही शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत पोलिसांबरोबर वाद घातला आहे.

शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चाला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी नाकारली होती. पण दिल्ली पोलिसांनी शेतकरी मोर्चाला काही अटी व शर्थींवर परवानगी दिली. तसेच २६ जानेवारीला प्रजासत्ताकदिन असल्याने शेतकऱ्यांना काही ठराविक मार्गांवरूनच मोर्चा काढण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच फक्त ५ हजार ट्रॅक्टर व तेवढेच शेतकरी या आंदोलनात सहभागी होऊ शकतात याच अटीवर मोर्चास परवानगी दिली. पण या आंदोलनात ५ हजार नाही तर २.५ लाख ट्रॅक्टरसह ५ लाख शेतकरी सहभागी होणार असा दावा संयुक्त किसान मोर्चाने केला. यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दिल्लीत मोठ्या फौजफाट्यासह पोलीस तैनात करण्यात आले आहेत. पण शेतकऱ्यांच्या संख्येत वाढच होत असल्याने पोलिसांची अधिक कुमक मागवण्यात आली आहे. तसेच पोलिसांनी आखून दिलेल्या मार्गावरून न जाता शेतकरी वेगळ्याच मार्गाने दिल्लीत घुसण्याचा प्रयत्न करत असल्याने घातपाताची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. दिल्लीच्या मुकरबा चौकात पोलीस व आंदोलक यांच्यात संघर्ष झाला आहे. यावेळी शेतकऱ्यांनी पोलिसांच्या वाहनांवर हल्ला केला. त्यांच्या हातातील बंदुकाही हिसाकवून घेत, खासगी बसेस पेटवल्या

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -