देशात महागाईने कळस गाठला आहे. इंधनाचे वाढते दर, डाळींचे, भाज्यांचे वाढते दर यामुळे सर्वसामान्य जनता बेजार झाली आहे. मात्र, भाजपचे नेते महागाई कमी करण्यासाठी अजब सल्ला देत आहेत. ज्यांना महागाई आपत्ती वाटत आहे त्यांनी, खाणं पिणं बंद करा, पेट्रोल भरायचं बंद करा, असा अजब सल्ला छत्तीसगडचे माजी मंत्री बृजमोहन अग्रवाल यांनी दिला. यावेळी त्यांनी काँग्रेसला लक्ष्य केलं. काँग्रेसची खिल्ली उडवताना ज्यांनी काँग्रेसला मत दिलं ते आणि काँग्रेसच्या लोकांनी असं केलं तर महागाई कमी होईल, असं अग्रवाल म्हणाले. त्यांच्या विधानामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे.
बृजमोहन अग्रवाल यांच्या वक्तव्याचा काँग्रेसने चांगलाच समाचार घेतला आहे. प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्ते सुशील आनंद शुक्ला यांनी बृजमोहन अग्रवाल यांच्या वक्तव्यावर पलटवार केला आहे. सुशील शुक्ला यांनी ट्वीट करून म्हटलं आहे की, “भाजप आमदाराचा निर्लज्ज सल्ला पहा. लोकांनी अन्न पिणे बंद केले, पेट्रोल आणि डिझेलचा वापर थांबवला तर महागाई कमी होईल.”
कॉंग्रेसने खिल्ली उडविली
सुशील आनंद शुक्ला म्हणाले की बृजमोहन अग्रवाल यांचे हे विधान निर्लज्जपणाची मर्यादा आहे. महागाईच्या प्रचंड वाढीमुळे देशातील मध्यमवर्गीय व गरीब वर्ग त्रस्त आहे. केंद्र सरकारच्या धोरणामुळे लोकांच्या घरांच्या चुली विझत आहेत. भाजप नेत्याचे विधान म्हणजे सामन्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखं आहे.