देशभरात कोरोना दुसऱ्या लाटेने थैमान घातले असून कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दिवसाला साडे तीन लाखांहून अधिक रुग्णांची भर पडत आहे. शिवाय देशातील कोरोना मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. या अनुषंगाने आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल म्हणाले की, ‘देशातील मृत्यूसंख्या वाढल्याचे दिसून आले आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, दिल्ली आणि हरयाणा या राज्यांमध्ये मृत्यूची संख्या सर्वाधिक आहे. दिवसाला सुमारे २.४ टक्के कोरोना केसेसमध्ये वाढ दिसून आली आहे.’
An increase in deaths has been noticed too. Maharashtra, Karnataka, Andhra Pradesh, Delhi, and Haryana reported more death cases: Lav Agarwal, Joint Secretary, Union Health Ministry pic.twitter.com/J8LNygdXnt
— ANI (@ANI) May 5, 2021
पुढे लव अग्रवाल यांनी सांगितले की, ‘देशातील १२ राज्यांमध्ये १ लाखांहून अधिक सक्रिय रुग्ण आहे. तर ७ राज्यांमध्ये ५० हजार ते १ लाख सक्रिय रुग्ण असून १७ राज्यांमध्ये ५० हजारांपेक्षा कमी सक्रिय रुग्ण आहेत. महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशात जवळपास दीड लाख सक्रिय रुग्ण आहेत.’
‘देशात चिंतेची काही क्षेत्र आहेत. बंगळुरुमध्ये गेल्या एका आठवड्यात सुमारे १.४९ लाख कोरोना केसेसची नोंद झाली. तर चेन्नईमध्ये ३८ हजार केसेसची नोंद झाली. काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. त्यामध्ये कोझिकोड, एर्नाकुलम, गुरुग्राम यांचा समावेश आहे,’ असे लव अग्रवाल यांनी सांगितले.
‘दरम्यान १ मेपासून लसीकरणासाठी उदारीकरण धोरण सुरू करण्यात आले. त्या अंतर्गत ९ राज्यांमध्ये ही मोहीम सुरळीत सुरू झाली आहे आणि १८ ते ४४ वयोगटातील ६.१७ लाख लोकांना लस देण्यात आली आहे,’ अशी माहिती लव अग्रवाल यांनी दिली.
हेही वाचा – मोदी आणि बोरिस जॉनसन यांच्यात झाली बैठक, कोरोनासह ‘या’ मुद्दांवर झाली चर्चा