भारत पाकव्याप्त काश्मीर पुन्हा मिळवणार – परराष्ट्रमंत्र्यांचं विधान

भारत पाकव्याप्त काश्मीर पुन्हा मिळवणार – परराष्ट्रमंत्र्यांचं विधान

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर

एकीकडे जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द केल्यापासून भारत सरकारने काश्मीरबद्दल घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे पाकिस्तान सरकार गोंधळलेल्या अवस्थेत आहे. त्यातच आता भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पाकव्याप्त काश्मीरबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे त्यात भर पडणार आहे. ‘पाकव्याप्त काश्मीरबद्दल भारताची भूमिका सुरूवातीपासून स्पष्ट आहे. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग होता आणि आहे. एक दिवस भारत तो भाग परत घेईल’, असं जयशंकर म्हणाले आहेत. त्यामुळे कलम ३७०नंतर आता पाकव्याप्त काश्मीरबद्दल भारत कठोर भूमिका घेणार का? हा आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय ठरला आहे.

POK बद्दल कठोर भूमिका?

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारसोबतच केंद्रीय अर्थमंत्रालयाचे देखील १०० दिवस पूर्ण झाले आहेत. त्यानिमित्ताने राजधानी दिल्लीमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी बोलताना परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पाकव्याप्त काश्मीरबद्दल भारताच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. मात्र, त्यासोबतच त्यांनी ‘भारत एक दिवस पाकव्याप्त काश्मीर परत घेईलच’, असं देखील म्हटल्यामुळे या वक्तव्यावर नवी चर्चा सुरू झाली आहे. मागील महिन्यातच भारताने कलम ३७० हटवून जम्मू-काश्मीरचा स्वतंत्र राज्याचा दर्जा रद्द ठरवला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता पाकव्याप्त काश्मीरबाबत देखील आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताकडून कठोर भूमिका घेतली जाण्याची शक्यता आहे.


हेही वाचा – कलम ३७०: केंद्र सरकारला नोटीस; ५ न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे सुनावणी

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी देखील पाकव्याप्त काश्मीर परत मिळवणं, हेच सरकारचं पुढील धोरण असेल, अशा स्वरूपाचं वक्तव्य केलं होतं. त्या पार्श्वभूमीवर जयशंकर यांनी केलेलं हे वक्तव्य महत्त्वाचं मानलं जात आहे. यावेळी पाकिस्तानविषयी बोलताना जयशंकर यांनी परखड शब्दांमध्ये टीका केली आहे. ‘भारत शेजारधर्म निभावतो, मात्र शेजारी देश मात्र वेगळ्याच भूमिकेवर आहे. त्यांनी आपली वर्तणूक सुधारणं आवश्यक आहे’, असं ते म्हणाले.

First Published on: September 17, 2019 8:37 PM
Exit mobile version