झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना बेकायदेशीर खाणकाम केल्याप्रकरणी ईडीने समन्स बजावलं आहे. परंतु ईडीने समन्स पाठवून सुद्धा हेमंत सोरेने हे ईडीच्या कार्यालयात हजर झाले नाहीत. दरम्यान, ईडीचं समन्स कशासाठी?, हिंमत असेल तर अटक करून दाखवा, असे थेट आव्हान मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ई़डीला दिलं आहे. या प्रकरणी झारखंड मुक्ती मोर्चाचे कार्यकर्ते रांची येथे एकत्र येऊन भाजप आणि केंद्र सरकारचा निषेध करत आहेत.
हेमंत सोरेन यांनी ईडी आणि केंद्र सरकारवर टीका करत त्यांनी आदिवासींचा प्रश्नही उपस्थित केला. राज्यात काही बाहेरच्या टोळ्या घुसत असून तिच लोकं येथील आदिवासींना स्वतःच्या पायावर उभा राहू देत नाहीत. आज सीबीआय आणि ईडीचा शस्त्रासारखा वापर केला जात आहे. ते आमच्या सरकारचे काही बिघडवू शकत नाहीत आणि सरकार पाच वर्षे पूर्ण करेल, अशी टीका हेमंत सोरेन यांनी भाजपवर केली. तसेच या भाषणानंतर ते छत्तीसगडला जाणार आहेत.
ईडीकडून पाठवण्यात आलेल्या समन्सविषयी बोलताना हेमंत सोरेन म्हणाले की, ज्यावेळी मला आदिवासी परिषदेचे निमंत्रण मिळाले होते, त्याच दिवशी हे समन्स मिळाले आहे. ईडीला मी गुन्हेगार वाटत असेल तर त्यांनी मला येथे येऊन अटक करुन दाखवावी, असं सोरेन म्हणाले.