पत्रकारिता आपली विश्वसनीयता गमावतेय, नितीन गडकरी यांची खंत

पत्रकारिता आपली विश्वसनीयता गमावतेय, नितीन गडकरी यांची खंत

नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या एका वक्तव्याचा माध्यमांनी विपर्यास केल्याबद्दल खेद व्यक्त केला. सरकारच्या फार भरवशावर राहू नका, मी सरकार आहे म्हणून तुम्हाला सांगतो, असे मत त्यांनी एका कार्यक्रमात व्यक्त केले होते. पण मागचा-पुढचा संदर्भ सोडून हे वक्तव्य प्रसिद्ध केले. यावरून, पत्रकारिता आपली विश्वसनीयता गमावतेय, अशी खंत नितीन गडकरी यांची व्यक्त केली.

नागपुरातील अॅग्रो व्हिजन फाऊंडेशनच्या शनिवारी झालेल्या कार्यक्रमात बोलताना शेतकऱ्यांनी सरकारवर फारसे अवलंबून राहू नये. मी स्वतः सरकारमध्ये आहे म्हणून तुम्हाला सांगत आहे, असे त्यांनी म्हटले होते. अलीकडेच जाहीर करण्यात आलेल्या भाजपाच्या केंद्रीय संसदीय समिती तसेच निवडणूक समितीतून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना वगळण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांचे हे वक्तव्य आले होते. त्यामुळे ही नाराजी त्यांनी व्यक्त केली असा तर्क माध्यमांकडून काढण्यात आला. मात्र आपल्या ट्वीटर हॅण्डलवरून एक व्हिडीओ शेअर करून नितीन गडकरी यांनी याचे खंडन केले आहे.

शेतकऱ्यांसमोर मी ते भाषण केले होते. आपला परमेश्वर आणि सरकारवर विश्वास असतो, असे मी म्हटले होते. पण खऱ्या अर्थाने आपल्याच आपले जीवन बदलायचे असते. तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस. सरकार आणि परमेश्वराचा आशीर्वाद आणि मदत हवी. पण त्यावर पूर्णपणे विसंबून राहणे योग्य नाही. मेहनतीने आणि कष्टाने आपले जीवन बदलले पाहिजे, असे मी म्हटले होते. पण त्याच्या मागचा आणि पुढचा संदर्भ काढून टाकून ते दिवसभर चालवायचे, अशा प्रकारची अप्रमाणिक पत्रकारिता पत्रकारांबद्दलचा विश्वास गमावणारी आहे, असे गडकरी यांनी म्हटले आहे.

असा खोडसाळपणा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. हे योग्य नाही. मी जे काही बोलतो, ते जरूर लिहा. यामुळे कधी कधी मला पत्रकारांनाही भेटू नये, असे वाटते. पत्रकारांनीही आत्मपरीक्षण करून असा खोटारडेपणा करू नये. जे बोललो तेच द्यावे, अशी माझी अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.

First Published on: September 12, 2022 10:23 PM
Exit mobile version