देशात कोरोना विषाणूचा फैलाव दिवसागणिक वाढताना दिसत आहे. जगातील कोरोनाग्रस्तांच्या यादीत भारत आता चौथ्या स्थानावर आहे. आता देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ३ लाख पार झाला आहे. तसेच ८ हजारांहून अधिक जणांचा बळी गेला आहे. देशात सर्वाधिक कोरोनाबाधित राज्य महाराष्ट्र असून राज्यातील एकूण बाधितांचा आकडा १ लाख पार झाला आहे.
कोविड-१९ इंडिया ट्रॅकर या अधिकृत वेबसाईटनुसार, देशात आतापर्यंत ३ लाख ९ हजार ४०५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर ८ हजार ८९० जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच १ लाख ५४ हजार १३३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत देशात १ लाख ४६ हजार ३६० रुग्ण अॅक्टिव्ह आहेत.
देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आढळले असून आतापर्यंत महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख १ हजार १४१ आहे. तर मृतांचा आकडा ३ हजार ७१७ आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या एकट्या मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा ५५ हजार ३५७ झाला असून मृतांचा आकडा २ हजार ४२वर पोहचला आहे. महाराष्ट्राच्या पाठोपाठ तमिळनाडू, दिल्ली, गुजरात आणि उत्तर प्रदेश राज्य आहेत. तमिळनाडूत ४० हजार ६९८, दिल्ली ३६ हजार ८२४, गुजरात २२ हजार ५६२ तर उत्तर प्रदेश १२ हजार ६१६ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. देशात आठ राज्यात कोरोनाचे १० हजाराहून अधिक रुग्ण आहेत.
हेही वाचा – काळ्या गव्हाच्या पिकाने शेतकऱ्याचे बदलले नशीब!