नवीन संसद भवन उद्घाटनानंतर राहुल गांधींचं पहिलं ट्विट, मोदींना म्हणाले…

नवीन संसद भवन उद्घाटनानंतर राहुल गांधींचं पहिलं ट्विट, मोदींना म्हणाले…

संसद उद्घाटन सोहळ्याला पंतप्रधान मोदी हे राज्याभिषेक असल्याचे समजत आहे - राहुल गांधी

नवी दिल्ली – नवीन संसदेचे उद्घाटन आज (रविवार) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झालं. केंद्र सरकारने या वास्तू उद्गघाटन सोहळ्याला मोठे राजकीय स्वरुप आणि भव्यता दिल्याचे संपूर्ण देशाने पाहिले. संसदेच्या उद्घाटन सोहळ्यावर काँग्रेससह २० विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला होता. उद्घाटन होताच काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करत नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. फक्त दोन ओळींचे ट्विट करत राहुल गांधी यांनी मोदींवर टीकास्त्र सोडले आहे.

नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाला देशाच्या प्रथम नागरिक राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांना निमंत्रणही देण्यात आले नव्हते, असा विरोधकांचा आरोप आहे. यामुळेच २० हून अधिक पक्षांनी नवीन संसदेच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कार टाकला. संसद हे लोकशाहीचे मंदिर आहे. संसदेचे प्रमुख हे राष्ट्रपती असतात, त्यांनाच डावलून होत असलेल्या या सोहळ्यावर बहिष्कार असल्याचे संयुक्त निवदेन २० पक्षांनी जारी केले आहे.

संसदेच्या उद्घाटन सोहळ्याला सुरुवात झाल्यानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी दोन ओळींचे ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.
राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, “संसद लोकांचा आवाज आहे. पंतप्रधान संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्याला राज्याभिषेक समजत आहेत.”

तामिळनाडूहून आणलेले सेंगोल आज पंतप्रधानांनी संत-महंताच्या हस्ते स्वीकारुन तो लोकसभा अध्यक्षांच्या आसनाशेजारी स्थापित केला आहे. संत-महंतांकडून सेंगोल स्वीकारणे आणि त्यानुसार राज्यकारभार करणे ही राजीशाही परंपरा चोल वंशीय राज्यकारभारात सुरु होती. आज पंतप्रधानांनी त्याच परंपरेला अनुसरुन सेंगोल स्वीकारला आणि स्वतःचा राज्याभिषेक करुन घेतल्याची टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

नवीन संसद भवनाच्या उद्घटानाचे अनेक खासदारांनाही आमंत्रण दिलेले नाही, असा दावा विरोधी पक्षातील खासदारांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना व्हॉट्सअॅपवर पत्रिका पाठवण्यात आली, असे त्यांनी स्वतः सांगितले आहे. एखाद्या मंत्र्याने फोन जरी केला असता, तरी मी या सोहळ्यात सहभागी झाले असते, असेही खासदार सुळे म्हणाल्या.

शरद पवारांनी व्यक्त केली नाराजी
संसदेच्या उद्घाटन सोहळ्यावर राष्ट्रवादी काँग्रेसनेही बहिष्कार टाकलेला आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, आज टीव्हीवर तो सोहळा पाहात असताना वाटलं, की बरं झालं आपण तिथे गेलो नाही.

पवार म्हणाले, “ज्या लोकांची तिथं उपस्थित होती, जे काही धर्मकांड सुरू होतं, ते पाहिल्यानंतर पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आधुनिक भारताची जी संकल्पना मांडली होती, ती, आणि आता तिथे पार्लमेंटमध्ये जे चाललंय यात जमीन-अस्मानाचं अंतर आहे. पुन्हा एकदा आपण देशाला काही वर्ष पाठीमागे नेतो की काय, अशी चिंता वाटू लागली आहे. विज्ञानाशी तडजोड करता येत नाही. नेहरूंनी आधुनिक विज्ञानावर आधारीत समाज तयार करण्याची भूमिका सतत मांडली. आज त्या ठिकाणी (नवीन संसद भवनात) जे चाललं ते नेमकं उलटं चाललं आहे.”

First Published on: May 28, 2023 2:50 PM
Exit mobile version