लालू यादव यांना विष देऊन मारण्याचा भाजपचा डाव; राबडीदेवींचा आरोप

लालू यादव यांना विष देऊन मारण्याचा भाजपचा डाव; राबडीदेवींचा आरोप

बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांना लँड फॉर जॉब स्कॅम प्रकरणात ईडीचा सामना करावा लागत आहे.

बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांनी आज एक खळबळजनक दावा केला आहे. राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि माजी रेल्वे मंत्री लालू प्रसाद यांच्या जीवाला धोका असल्याचे धक्कादायक ट्विट राबडीदेवी यांनी केले आहे. भाजप पक्षावर त्यांनी थेट आरोप केला आहे. भाजप सरकार लालू यादव यांना विष देऊन मारण्याचा कट रचत असल्याचा खळबळजनक आरोप राबडी देवी यांनी केला आहे. भाजप हुकूमशाहीचे वर्तन करत असल्याचे त्या म्हणाल्या आहेत.

लालू प्रसाद यादव हे चारा घोटाळ्याप्रकरणी शिक्षा भोगत आहेत. मात्र प्रकृती ठिक नसल्यामुळे ते रांची येथील एम्स रुग्णालयात उपचार घेत आहेत. राबडीदेवी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून कोणालाही लालूप्रसाद यांची भेट घेऊ दिली जात नाही आहे. एवढंच काय तर त्यांच्या मुलांनाही भेटू दिले जात नाहीये. शनिवारी त्यांची तीन व्यक्तींशी भेट घेण्याचे निश्चित झाले होते, मात्र रुग्णालय प्रशासनाने सुरक्षा व्यवस्थेचे कारण देत ही भेट नाकारली.

राबडीदेवी यांनी ट्विट करुन आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या की, “भाजप सरकार लालूंना मारण्याच्या विचारात आहे. भारत सरकारला वेड लागले आहे. नियमांचा आधार घेऊन लालूंच्या परिवारासोबत हुकूमशाहीचा व्यवहार केला जात आहे. बिहार, झारखंडमधील जनता जर रस्त्यावर उतरली तर त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत.”

 

First Published on: April 20, 2019 11:05 PM
Exit mobile version