राजस्थानमध्ये राजकीय हालचालींना वेग; नाराज पायलट यांना प्रियांका गांधींचा रात्री उशिरा फोन

राजस्थानमध्ये राजकीय हालचालींना वेग; नाराज पायलट यांना प्रियांका गांधींचा रात्री उशिरा फोन

नाराज सचिन पायलट यांना प्रियांका गांधी यांनी रात्री उशिरा फोन केला.

राजस्थानमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट सामंजस्य समितीच्या अहवालावर नाराज आहेत. नाराज सॅक्सहीं पायलट यांची समजूत काढण्याचा प्रयत्न कॉंग्रेस हाय कमांडने केला आहे. कॉंग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्यासह कॉंग्रेसच्या सर्व बड्या नेत्यांनी रात्री उशिरा सचिन पायलट यांना फोन करून त्यांची समजूत काढत यावर तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं आहे.

आज यासंदर्भात सचिन पायलट दिल्लीला जाणार आहेत. दरम्यान, आज अचानक सचिन पायलट पहाटे दौसा येथे पोहोचले आहेत. या ठिकाणी पायलट यांनी दिवंगत वडील राजेश पायलट यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांच्यासोबत सहा आमदार होते. यादरम्यान, सचिन पायलट गटातून राजीनामा देणारे आमदार हेमाराम चौधरी रात्री उशिरा जयपूरला पोहोचले आहेत. ते आज सभापती सीपी जोशी यांची भेट घेतील. वैयक्तिक बैठक घेतल्यानंतरच राजीनाम्याचा निर्णय घेण्यात येईल, असं विधानसभेचे अध्यक्ष सीपी जोशी म्हणाले.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

देशातील सर्वांत जुना पक्ष असलेला कॉंग्रेस या दिवसात वाईट काळातून जात आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. जितिन प्रसाद यांनी कॉंग्रेस सोडली. नवजोतसिंग सिद्धू आणि सचिन पायलट नाराज आहेत. कॉंग्रेसमध्ये विचारमंथन व चिंतन सुरू आहे. सध्या, सचिन पायलट यांनी मौन धारण केलं आहे, परंतु याचं कारण असंतोष आहे.

पंजाबमध्ये हा वाद १० दिवसात निकाली निघाला होता, तर राजस्थानमध्ये १० महिन्यांनंतर मार्ग का सापडला नाही? असा सवाल पायलट समर्थक आमदारांनी केला आहे. कॉंग्रेस सरचिटणीस भंवर जितेंद्र सिंह यांनीही सचिन पायलट यांना दिलेली आश्वासने पाळली पाहिजेत, असं या आमदारांचं म्हणणं आहे. एकीकडे कॉंग्रेसमध्ये मंथन सुरू आहे आणि दुसरीकडे सचिन पायलट यांनी काल घरी बैठक घेतली.

First Published on: June 11, 2021 11:38 AM
Exit mobile version