मद्रास उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगावर कोरोना काळात निवडणुका घेतल्यामुळे ताशेरे ओढले आहेत. यावर भाष्य करताना शिवसेनेचे खासादार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजप आणि निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. मद्रास उच्च न्यायालयाने जी टीप्पणी केली आहे की कोरोनाच्या वाढत्या संक्रमणास निवडणूक आयोग जबाबदार आहे. हे आम्ही अनेक महिने सांगतोय. ममता बॅनर्जी असतील विरोधी पक्षाचे नेते सांगत होते की एवढी घाई का? लोकांचे जीव महत्त्वाचे आहेत की निवडणुका जिंकणं महत्त्वाचं आहे? हे जेव्हा आम्ही सांगत होतो, तेव्हा आम्हाला भाजपच्या दिल्लीतील नेत्यांनी ज्ञानाचे सल्ले दिले.
आम्ही जेव्ही प्रचारात होत असलेल्या गर्दीवर बोलत होतो तेव्हा दिल्लीतील काही भाजपचे मोठे नेते आम्हाला ज्ञान देत होते की निवडणुका आणि कोरोनाचा काही संबंध नाही. महाराष्ट्रात निवडणुका नाही तिथे कोरोना वाढतोय असं सांगत होते. हे त्यांचं चुकीचं आहे. भाजपने संपूर्ण देशातून प्रचारासाठी बंगालमध्ये लोकं गोळा केली, तेच लोकं त्यांच्या राज्यात गेले आणि तिथे कोरोनाचं संक्रमण वाढलं हे सत्य आहे. जर आम्ही हरिद्वारच्या कुंभमेळाव्यावर आक्षेप घेतोय, मोठ्या प्रमाणात गर्दी जमा करुन कोरोना वाढवला, तर मग अशाप्रकारे राजकीय कुंभमेळा चार राज्यांच्या निवडणुकांमध्ये झाला आहे आणि तिथे कोरोना वाढला. सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाला, प्रोटोकॉलचं पालन करण्यात आलं नाही. इतर वेळेला इतर गोष्टी निवडणुकांमध्ये माफ असतात, पण आताच्या घडीला हे सर्व महत्त्वाचं आहे, असं संजय राऊत म्हणाले.
पंतप्रधान मोदी अनेक गोष्टी गंभीरपणे घेतात. ते मद्रास उच्च न्यायालयाच्या सूचनाही गंभीरपणे घेतील, असा विश्वास आहे, असं राऊत म्हणाले. यावेळी त्यांनी माजी निवडणुक आयुक्तांवर निशाणा साधला. कोरोनाचा संसर्ग वाढला म्हणून निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करू नये, असं मद्रास उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. ज्या निवडणूक आयुक्तांच्या काळात कोरोनाचा फैलाव झाला. त्याच निवडणूक आयुक्तांना राज्यपाल केलं जात आहे हे आम्ही ऐकून आहोत. एकीकडे न्यायालय मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा असं म्हणत आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकार निवडणूक आयुक्तांना रिटर्न गिफ्ट देत आहे, असा चिमटाही संजय राऊतांनी काढला.