केंद्र सरकारच्या नव्या तीन कृषी कायद्यांविरोधात गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीतील वेगवेगळ्या बॉर्डरवर शेतकरी आंदोलन करत आहेत. त्यातच प्रजासत्ताक दिनी या आंदोलनाने हिंसक वळण घेतले. तर बऱ्याच विदेशी सेलिब्रेटींनी या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत त्यात उडी घेतली आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या कमेंट्स आणि पोस्ट्स सध्या विदेशी सेलिब्रेटींकडून केल्या जात आहेत. अशा अभिनेत्रींची भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने निवेदन देत चांगलीच कानउघाडणी केली आहे.
‘आपण याबद्दल का बोलत नाही?’
नव्याने लावण्यात आलेले कृषी कायदे मागे घेण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. या शेतकऱ्यांना आता आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील पाठिंबा दिला जात आहे. आता जगप्रसिद्ध पॉपस्टार रिहाना (rihanna) देखील यात सामिल झाली आहे. रिहानाने शेतकरी आंदोलना संदर्भात एक ट्विट केलं आहे आणि ‘आपण याबद्दल का बोलत नाही?’ असा सवाल तिने केला आहे. तसेच तिने हे ट्विट करत#FarmersProtestचा वापर केला आहे. तर मिया खलिफाने देखील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. तर अनेक सेलिब्रेटिंच्या पोस्ट चांगल्याच चर्चेत आल्या आहेत.
परराष्ट्र मंत्रालयाने दिले सडेतोड उत्तर
सेलिब्रेटींनी केलेल्या ट्विटबाबत परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन काढले आहे. या निवेदनातून त्यांनी सेलिब्रेटिंना सडेतोड उत्तर दिले आहे. त्यात ते म्हणाले आहेत की, ‘अशा विषयांवर बोलण्याआधी आपण वस्तुस्थिती समजून घ्यायला हवी. शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे योग्यप्रकारे निरसन होणे आवश्यक आहे. देशातील एक गट असा आहे जो स्वार्थासाठी भारताविरुद्ध आंतरराष्ट्रीय पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. हे समस्त भारतासाठी आणि प्रत्येक ठिकाणच्या सुसंस्कृत समाजासाठी अतिशय त्रासदायक आहे’.
हेही वाचा – रिहानाचे शेतकरी आंदोलनावर ट्विट; कंगना म्हणाली, ‘ऐ मुर्ख ते शेतकरी नाही तर दहशतवादी!’