देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांचा आज निकाल लागला. देशाची नजर पश्चिम बंगालमधील नंदीग्राम विधानसभा मतदारसंघाच्या निकालाकडे होती. हा निकाल तृणमूल काँग्रेससाठी अत्यंत धक्कादायक आला आहे. कारण तृणमूलच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांचा भाजपचे सुवेंदू अधिकारी यांनी पराभव केला. १९५३ मतांनी सुवेंदू अधिकारी विजयी झाले आहेत.
याआधी ममता बॅनर्जी यांचा १२०० मतांनी विजय मिळवला असल्याबाबत एएनआयनं माहिती दिली होती. त्यामुळं ममता यांचा विजय झाला असल्याचं वृत्त देण्यात आलं होतं. मात्र नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी यांचा १९५३ मतांनी पराभव झाला आहे. राज्यात निर्विवादपणे एकहाती सत्ता मिळवणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्या नंदीग्राममधील पराभवानंतर गड आला पण सिंह गेला अशी स्थिती झाली आहे.
ममता बॅनर्जी यांनी निकाल आल्यानंतर प्रतिक्रिया दिली होती. नंदीग्रामबद्दल काळजी करू नका, मी नंदीग्रामसाठी संघर्ष केला आहे. कारण माझ्यासाठी ही निवडणूक एक आंदोलन होती. नंदीग्राममधील लोकांनी जो कौल दिला तो मी स्वीकारते. आम्ही २२१ हून अधिक जागा जिंकल्या आणि भाजप निवडणूक हरला आहे, असं ममता बॅनर्जींनी म्हटलं आहे.
ममता यांच्या पराभवानंतर तृणमूलचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी देखील ट्वीट केलं आहे. काही मोठ्या लढाया जिंकण्यासाठी बलिदान तर द्यावंच लागतं, असं त्यांनी म्हटलं आहे.
“For winning a greater battle, you must sacrifice something.” @MamataOfficial
— Derek O’Brien | ডেরেক ও’ব্রায়েন (@derekobrienmp) May 2, 2021