भारतीय उद्योजक जे.आर.डी.टाटा

भारतीय उद्योजक जे.आर.डी.टाटा

जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा उर्फ जे.आर.डी.टाटा हे भारतीय उद्योजक होते. ते भारतातील विमान वाहतूक उद्योगाचे जनक मानले जातात. त्यांचा जन्म 29 जुलै १९०४ मध्ये पॅरिसमध्ये झाला. रतनजी दादाभॉय टाटांचे ते दुसरे पुत्र होते. मुंबईतील कॅथेड्रलंड जॉन केनॉन स्कूल येथे काही वर्ष ते शिकले, पण त्यांची आई फ्रेंच असल्यामुळे त्यांचे बालपण मुख्यत: फ्रान्समध्ये गेले. काही कारणाने ते मॅट्रिक परीक्षेपुढे शिकू शकले नाहीत.

इंग्लिश खाडी विमानाद्वारे पहिल्यांदा पार करणारे सुप्रसिद्ध फ्रेंच वैमानिक लुईस ब्लेरिअट यांच्या जीवनकार्याने ते खूप प्रभावित झाले होते. त्यामुळे त्यांनीही विमान शिकण्याचा ध्यास घेतला. १९२९ साली त्यांनी वैमानिकाचा परवाना मिळवला. 1९३२ मध्ये त्यांनी टाटा एअरलाईन्स या पहिल्या भारतीय प्रवासी विमानवाहतूक कंपनीची स्थापना केली. पुढे १९४६ मध्ये तिचे नाव बदलून एअर इंडिया ठेवले गेले.

वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी म्हणजे १९३८ मध्ये ते टाटा सन्स उद्योगसमूहाचे चेअरमन बनले. ते प्रदीर्घ काळ त्या पदावर होते. त्यांनी पदभार सांभाळला तेव्हा टाटा सन्स उद्योगसमूहाच्या १४ कंपन्या होत्या. त्यांच्या काळात ९१ कंपन्यांची भर पडली. रसायन, वाहन, चहा, माहिती, हॉटेले आणि तंत्रज्ञान अशा नवीन क्षेत्रांत त्यांनी टाटा उद्योगसमूहाचा विस्तार केला. त्यांच्या पुढाकाराने १९५६ मध्ये कंपनीतील कामगारांच्या कल्याणासाठी खास योजना राबविण्यात आली. त्यामध्ये ‘दिवसातून आठ तास काम’, ‘मोफत आरोग्यसेवा’, ‘भविष्य निर्वाह निधी’ आणि ‘अपघात विमा योजना’ अशा पायाभूत गोष्टींचा समावेश करण्यात आला होता.

पुढे या योजना भारतीय केंद्र शासनाने सर्व उद्योग-व्यवसायांसाठी कायदेशीररित्या बंधनकारक केल्या. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. भारतीय केंद्र शासनातर्फे त्यांना १९५७ मध्ये पद्मविभूषण, तर १९९२ मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले. अशा या कर्तृत्ववान उद्योजकाचे 29 नोव्हेंबर १९९३ रोजी निधन झाले.

First Published on: July 29, 2022 2:00 AM
Exit mobile version