टीव्ही कलाकार समीर शर्मा याच्या आत्महत्येनंतर चार दिवसांपूर्वी झालेल्या आणखी एका कलाकाराच्या आत्महत्येचा विषय आज चर्चेला आला आहे. २ ऑगस्ट रोजी भोजपुरी अभिनेत्री अनुपमा पाठक यांनी देखील मुंबईतील घरात आत्महत्या केली होती. धक्कादायक बाब म्हणजे आत्महत्येपुर्वी अनुपमा या फेसबुकवर १० मिनिट लाईव्ह होत्या. या लाईव्हमध्ये लोक आत्महत्या का करतात? या विषयावर त्या बोलत होत्या. ‘माझ्या मृत्यूला केवळ मीच जबाबदार असेन’, असे वाक्य त्यांनी लाईव्हमध्ये म्हटले होते.
आपल्या लाईव्हमध्ये अनुपमा या भावनिकदृष्ट्या ढासळलेल्या स्थितीत दिसून आल्या. “या जगात कुणावरही विश्वास ठेवू नका. तुम्ही कुणाला विश्वासाने काही सांगायला गेलात तरी तुमची नंतर थट्टा केली जाते. आत्महत्या करण्याआधी कुणीही तुमच्याशी नीट बोलायला तयार नसते. एकदा तुम्ही या जगातून निघून गेला की, सर्वजण मदतीची भाषा वापरतात. मला सांगितलं असतं तर मी काहीतरी केलं असतं, अशी पोकळ वक्तव्ये केली जातात.”, अशी खंत अनुपमा यांनी बोलून दाखवली होती.
पिंकविला या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार आर्थिक अडचणीत असल्याच्या तणावातून अनुपमा यांनी हे पाऊल उचलले असण्याची शक्यता आहे. त्यांनी विस्डम प्रॉडक्शन कंपनीमध्ये १० हजार रुपयांची गुंतवणूक केली होती. डिसेंबर २०१९ मध्ये त्यांना नफ्यासहीत ते पैसे मिळणे अपेक्षित होते. मात्र कंपनीने त्यांचे पैसे देण्यास नकार दिला. एका मित्राच्या सांगण्यावरुन त्यांनी हे पैसे गुंतवले होते.