करण जोहरचा लोकप्रिय टॉक शो कॉफी विथ करण’च्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. हा शो प्रेक्षकांमध्ये चांगलाच गाजला. मात्र सहा यशस्वी सीझननंतर हा शो अखेर बंद झाला आहे. चित्रपट निर्माता आणि शोचा होस्ट, करण जोहरने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर यासंदर्भात पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने खुलासा केला की ‘कॉफी विथ करण’ सातव्या सीझनसह परत येणार नाही.
करण जोहरने त्याच्या सोशल मीडिया प्रोफाइलवर एक नोट शेअर करत लिहिले की, “‘कॉफी विथ करण’ हा माझ्या आणि तुमच्या आयुष्याचा एक भाग आहे, कारण आम्ही त्याचे 6 सीझन पूर्ण केले आहे. आम्ही या शोद्वारे लोकांवर प्रभाव पाडला तसेच पॉप संस्कृतीच्या इतिहासात एक स्थान कोरले आहे. म्हणून, मात्र मी आता जड अंतःकरणाने जाहीर करू इच्छितो की ‘कॉफी विथ करण’ यापुढे परत येणार नाही.”
सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस
करण जोहरने शो बंद करण्याची घोषणा करता सोशल मीडियावर प्रतिक्रिया आणि मीम्सचा पाऊस सुरु आहे. काही युजर्सनी शो बंद होण्यावर आनंद व्यक्त केला. एका युजरने लिहिले की, प्रभाव पडला? कोणावर, कोणत्या प्रकारचा प्रभाव. तर दुसऱ्या एका युजरने, Thank God असे लिहून एक्सप्रेशन दिले आहे.
हार्दिक पंड्याच्या ‘त्या’ प्रकरणाची चर्चा
करण जोहरचा कॉफी विथ करण हा अनेक वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत होता. दरम्यान शोच्या एका एपिसोडमध्ये काही वर्षांपूर्वी क्रिकेटपटू हार्दिक पंड्या आणि के.एल.राहुल यांनी हजेरी लावली होती. यावेळी हार्दिक पंड्याने केलेल्या वक्तव्याची बरीच चर्चा रंगली. हार्दिकने एका शोमध्ये लैंगिक आयुष्यासंदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावेळी हार्दिक पंड्यासह या शोवर बंदी घालण्याची मागणी जोर धरू लागली. दरम्यान बीसीसीआयने देखील हार्दिकने एका कार्यक्रमात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची गंभीर दखल घेत काही सामने बंदीची कारवाई करण्यात आली. त्यामुळे करणचा शो बंद झाल्याने आता हार्दिक पंड्याचे ते प्रकरणा पुन्हा चर्चेत आले आहे.
करण जोहरचा शो बंद होत असल्याने केएल राहुल आणि हार्दिक पांड्या सर्वाधिक खुश झाले असतील. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देखील युजर्सकडून येत आहेत.