मुंबई पोलिसांकडून सलमान खानला मिळणार Y+ सुरक्षा

मुंबई पोलिसांकडून सलमान खानला मिळणार Y+ सुरक्षा

बॉलिवूड अभिनेता सलमान खानची सुरक्षा लक्षात घेत त्याच्या सुरक्षेत आणखी वाढ करण्यात आली आहे. सलमानला आता Y+ सुरक्षा देण्यात येणार आहे. खरंतर, सलमानला मागील काही दिवसांपूर्वी बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. पंजाबमधील गायक सिद्धू मूसेवाला याची हत्या झाल्यानंतर अभिनेता सलमान खान याला धमकीचं पत्र मिळालं होतं. त्याला धमकी आल्यामुळे संपूर्ण बॉलिवूडमध्ये खळबळ माजली होती. सिद्धू मूसेवालाच्या हत्येमध्ये लॉरेंस बिश्नोई गँगचा हात असल्याचं देखील समोर आलं होतं.

यावर्षी 29 मे रोजी पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाची हत्या करण्यात आली. त्यानंतर सलमान खान आणि त्याचे पिता सलीम खान यांना एक धमकीचे पत्र मिळाले होते. ज्यामध्ये सलमानला देखील सिद्धू मुसेवालासारखं मारण्यात येईल असं लिहिलं होतं. त्यानंतर पोलिसांनी बिश्नोई गँगला अटक देखील केलं, ज्यामध्ये त्यांनी सलमान खानला मारण्याची कबुली दिली, त्यामुळे सलमानच्या सुरक्षेत आणखी वाढ करण्यात आली.

विक्रम बराडनेच पाठवलं होतं सलमानला पत्र

सलमानला धमकीचं पत्र पाठवणाऱ्यालाही पोलिसांनी ओळखलं आहे. विक्रमजीत सिंह बराड याने सलमानला हे पत्र पाठवलं आहे. विक्रम बराड हा राजस्थानचा कुख्यात गँगस्टर आनंदपाल याचा खास माणूस होता. मात्र, आनंदपालच्या एन्काऊंटरनंतर त्याने लॉरेन्स बिश्नोईसोबत तो जोडला गेला.

बराड हा राजस्थानमधील हनुमानगढ येथील रहिवासी असून सध्या तो देशाच्या बाहेर आहे. दोन दिवसाआधी या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेनेही सलमानची चौकशी केली होती. या चौकशीत गोल्डी ब्रारला ओळखत नसल्याचं सलमानने सांगितलं. मी लॉरेन्स बिश्नोईला ओळखतो, गेल्या काही वर्षांपासून चाललेल्या प्रकरणावरूनच मी त्याला ओळखतो. इतर लोक जेवढं त्याला ओळखतात, तेवढंच मी ओळखतो असंही सलमानने सांगितलं.


हेही वाचा :

आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला येतेय ‘फालतू’ मालिका

First Published on: November 1, 2022 3:58 PM
Exit mobile version