अभिनेत्री तनुश्री दत्ताने नानांवर केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. “जे दहा वर्षापूर्वी बोललो तेच खरं आहे. जे सत्य आहे ते कायम सत्यच राहणार”, असे स्पष्टीकरण नानांनी या पत्रकार परिषदेत दिले. तसेच वकिलांनी मला प्रसारमाध्यमांशी बोलायला मनाई केली आहे. तनुश्रीला कायदेशीर नोटीस पाठवेपर्यंत यावर काहीच बोलणार नाही, असे म्हणत केवळ अर्ध्या मिनिटात नानांनी ही पत्रकार परिषद संपवली. २००८ साली ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान तनूश्रीने नानानी माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला होता असा गंभीर आरोप केला होता. तब्बल दहा वर्षांपूर्वी झालेल्या घटनेचा धक्कादायकक खुलासा तनुश्रीने मीडियासमोर केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या आरोपांवर अखेर नाना पाटेकर यांनी मौन सोडले.
The truth which was there 10 years back, stands true even today: #NanaPatekar on allegations by #TanushreeDutta pic.twitter.com/veP5JNHYAK
— ANI (@ANI) October 8, 2018
काय होता नेमका आरोप
मॉडेल, अभिनेत्री तनुश्री दत्ताने अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप केला होता. ‘नानांमुळेच आपण बॉलीवूडला रामराम ठोकला होता,’ असे खळबळजनक वक्तव्य केले होते. २००८ साली तनुश्री दत्ता हिने अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप केला होता. यासंबंधी तिने पोलीस ठाण्यात तक्रारही केली होती. त्यानंतर पासूनच तनुश्रीच्या फिल्मी करिअरला उतरती कळा लागली, असे म्हटले जाते. ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटातील एका आयटम साँगसाठी तनुश्रीची निवड करण्यात आली होती. त्यावेळी तिने असे म्हटले होते की, नाना पाटेकर यांनी तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला होता. तसेच नानासोबत इंटिमेट सीन करण्यास आपण नकार दिला होता. त्यामुळे तिला चित्रपटातून काढून टाकण्यात आले.
तनुश्रीने नाना पाटेकर यांच्याविरोधात मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात शनिवारी लेखी तक्रार दाखल केली. नाना पाटेकर यांच्यासह कोरिओग्राफर गणेश आचार्य, निर्माता सामी सिद्दीकी, दिग्दर्शक राकेश सारंग, आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांचादेखील तक्रारीत उल्लेख आहे. तनुश्रीने नानांवर केलेल्या आरोपांवर अख्खे बॉलिवूड ढवळून निघाले आहे. फरहान अख्तर, प्रियांका चोप्रा, अनुष्का शर्मा यांसारख्या बऱ्याच कलाकारांनी तनुश्रीची पाठराखण केली आहे. तर काहींनी हा केवळ पब्लिसिटी स्टंट आहे अशी तनुश्रीवर टीका केली.
काय म्हणाली राखी
तनुश्री विरूद्ध नाना या वादात राखी सावंतने देखील उडी घेतली आहे. यावर बोलताना राखी म्हणाली,त्या वादग्रस्त ठरलेल्या गाण्याच्या चित्रीकरणासाठी रात्री २ वाजता मला नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य यांचा फोन आला. त्यांनी मला तातडीने शूटींगसाठी बोलवले. तू शूटींगला आली नाही तर निर्मात्याच खुप नुकसान होईल तो आत्महत्या करेल. तू धावत ये, अस मास्टरजी गणेश आचार्य म्हणाले. मला १०४ ताप होता. तरी मी तिथे गेले. गेल्यावर समजल की, तनुश्रीने स्वतःला वॅनिटी व्हॅनमध्ये कोंडून घेतले होते. काही नशात्मक पदार्थ तिने घेतले आणि कित्येक तास दारच उघडले नाही. अखेर ते गाणं माझ्यावर चित्रीत झालं.