चैत्र नवरात्रीची सुरुवात 22 मार्चपासून सुरु झाली असून 30 मार्च रोजी नवरात्र समाप्त होणार आहे. हिंदू धर्मात चैत्र नवरात्री विशेष महत्त्वपूर्ण आहे. नवरात्रीच्या नवमीला म्हणजेच चैत्र नवमीला संपूर्ण भारतात श्री प्रभू रामचंद्रांच्या जन्माचा उत्सव साजरा केला जातो. यंदा 30 मार्च रोजी रामनवमी साजरी केली जाणार आहे.
धार्मिक मान्यतेनुसार, चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथीला भगवान श्रीविष्णूंनी, प्रभू रामचंद्रांच्या रुपात पृथ्वीवर अवतार घेतला होता. त्यांच्याच जन्माचा उत्सव म्हणून हिंदू धर्मात रामनवमी साजरी केली जाते. आज आम्ही तुम्हाला प्रभू रामचंद्रांच्या जन्माचे रहस्य सांगणार आहोत.
काय आहे प्रभू श्री रामचंद्रांच्या जन्माचे रहस्य?
पौराणिक कथांनुसार, प्रभू श्री रामचंद्र हे भगवान श्रीविष्णूंचा सातवा अवतार मानला जातो. त्रेता युगामध्ये अयोध्येचा राजा दशरथ यांना कौशल्या, सुमित्रा आणि कैकयी या तीन राण्या होत्या. मात्र, या तिघांनाही मुलबाळ नव्हते. यामुळे व्याकूळ झालेल्या राजाने गुरु वशिष्ठ आणि श्रृंग ऋषींच्या नेतृत्वाखाली पुत्रेष्टी या दिव्य यज्ञाचे आयोजन केले. या यज्ञात अनेक ऋषी, ब्राह्मण आणि तपस्वी उपस्थित होते.
यज्ञ संपल्यानंतर राजा दशरथने यज्ञाचा नैवेद्य आपल्या तीन राण्यांना खायला दिला. प्रसाद खाल्ल्यानंतर तिन्ही राण्या गर्भवती झाल्या. त्यानंतर चैत्र रामनवमी तिथीला राणी कौशल्याने भगवान श्री रामचंद्रांना जन्म दिला, तर राणी सुमित्राने लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांना जन्म दिला आणि राणी कैकयीने भरतला जन्म दिला. या चारही पुत्रांच्या जन्माने राजा दशरथ आणि अयोध्या नगरी आनंदीत झाली.