दिवाळी सणातील सर्वात महत्त्वाचा आणि शेवटचा सण जो कार्तिक शुद्ध द्वितीयेला साजरा केला जातो तो म्हणजे भाऊबीज. यमद्वितीयाही या दिवसाला म्हटलं जातं. आज सर्वत्र दिवाळाचा शेवटचा सण भाऊबीज साजरा केला जातो. या दिवशी भाऊ-बहीण एकमेकांना भेटवस्तू देऊन एकमेकांच्या प्रती प्रेम व्यक्त करतात. यामुळे हे नातं अधिकाधिक घट्ट होत जातं. भाऊबीज दिवशी भाऊ बहीणच्या घरी जाऊन तिथे भाऊबीज करतो. पण यंदा कोरोनाचा सावटं आलं आहे. यंदा काही जण भाऊबीज ऑनलाईन पद्धतीने साजरा करणार आहेत. पण ही भाऊबीज करण्यामागील खरा उद्देश असतो हे आपण आज पाहणार आहोत.
भाऊबीज दिवशी भाऊ बहिणीच्या घरी गोडधोड भोजन करतो. त्यानंतर सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण पहिल्यांदा चंद्रकोरीला आणि नंतर भावाला ओवाळते. मग भाऊ बहिणीला ओवाळणी देतो आणि तिचा सत्कार करतो. शास्त्रानुसार भाऊबीजच्या दिवशी कोणत्याही पुरुषाने स्वतःच्या पत्नीच्या हाताचे अन्न घ्यायचे नसते तसेच घरी जेवायचे नसते. बहिणीच्या घरी जेवण्याची पद्धत असते. भाऊ नसल्यास या दिवशी चंद्राला ओवाळायचे असते. त्यामुळे आपण लहान मुलांना चंद्रला मामा अशी हाक मारायला शिकवतो.
या दिवशी भावाला आरती ओवाळून त्याची पूजा करतात. कारण त्याची यमराजाच्या पाशातून म्हणजेच मृत्यूपासून सुटका व्हावी आणि त्याला दीर्घायुषी मिळावे हा भाऊबीज सण साजरा करण्यामागचा खरा उद्देश असतो. या भावाला बहीण प्रेमाचा टीळा लावते आणि त्याची रक्षा व्हावी तो निरोगी राहावा यासाठी प्रार्थना करते.