कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे राज्याच्या तिजोरीत सर्वाधिक महसूल जदमा करणाऱ्या नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाला फटका बसला आहे. नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाला चालू आर्थिक वार्षाच्या पहिल्या सहामाहीत ७८१०.२१ कोटी रुपयांची तूट आली आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षांसाठी विभागाला २८ हजार कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आलं आहे. हे लक्ष्य गाठण्यासाठी येत्या सहा महिन्यात विभागाला तब्बल २१, ८१०.२१ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त करावा लागणार आहे.
दरवर्षी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला महसूल गोळा करण्यासाठी लक्ष्य दिलं जातं. मागिल तीन वर्षांत विभागाने दिलेल्या लक्ष्यापेक्षा अधिक महसूल गोळा केला आहे. पहिल्या सहामाहीत विभागाला दिलेल्या उद्दिष्टापेक्षा निम्मे उत्पन्न प्राप्त होते. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेला लॉकडाऊन, या लॉकडाऊनमध्ये अनेकांच्या गेलेल्या नोकऱ्या, मोठ्या किंमतीचे नोंदवले न गेलेले व्यवहार आणि राज्य सरकारकडून मुद्रांक शुल्कात दिलेली सूट अशा विविध कारणांमुळे विभागाला चालू आर्थिक वर्षांत उद्दिष्ट गाठताना कसरत करावी लागणार आहे.