अकोलातील अगस्ती साखर कारखान्यावर राष्ट्रवादीचा झेंडा; भाजपाचा पराभव

अकोलातील अगस्ती साखर कारखान्यावर राष्ट्रवादीचा झेंडा; भाजपाचा पराभव

अहमदनगर जिल्ह्यातील अगस्ती सहकारी साखर कारखाना निवडणुकीत पिचड पिता-पुत्रांना मोठा धक्का बसला आहे. ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड आणि माजी आमदार वैभव पिचड यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई असलेल्या साखर कारखान्याच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग न झाल्याने पॅनल टू पॅनल मतदान होऊन 1500 ते 2000 फरकाने समृध्दी मंडळाचे उमेदवार निवडून आले त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी झाल्याचे चित्र समोर आले आहे. (Agasti Cooperative Sugar Factory Elections Farmers Prosperity Development Board)

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील सहकाराची कामधेनू असलेल्या अगस्ती सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी रविवार 25 सप्टेंबर रोजी मतदान पार पडले. या निवडणुकीनंतर लागलेल्या निकालानुसार, अगस्ती सहकारी साखर कारखान्यावरील पिचड यांची सत्ता गेली असून विरोधकांचा दणदणीत विजय झाला आहे.

या निवडणुकीतील विजयानंतर “अकोले तालुक्यातील जनतेने पिचड यांचे पॅनल शंभर टक्के नाकारले असून हा विजय राष्ट्रवादीचा हा विजय पवारसाहेबांच्या विचारांचा आहे”, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी म्हटले.

“अकोले तालुक्यातील अगस्ती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाली. या निवडणुकीत कारखान्याचे उपाध्यक्ष सिताराम गायकर, कैलास वाकचौरे,अशोकराव भांगरे, आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने 21-0 ने पिचड पॅनेलचा धुव्वा उडवला. जवळपास 28 वर्षे मधुकरराव पिचड यांची एकहाती सत्ता असलेल्या या कारखान्यावर राष्ट्रवादीने बहुमताने सत्ता स्थापन केली आहे”, असे महेश तपासे यांनी म्हटले.


हेही वाचा – नारायण राणेंना सुप्रीम कोर्टाचा दणका, अधीश बंगल्यातील अवैध बांधकाम पाडण्याचे आदेश

First Published on: September 26, 2022 5:44 PM
Exit mobile version