अहमदनगर जिल्ह्यात ७०० टँकर्सने पाणी पुरवठा

अहमदनगर जिल्ह्यात ७०० टँकर्सने पाणी पुरवठा

जिल्ह्यातील दुष्काळाची दाहकता वाढली

नगर जिल्ह्यात यंदाच्या वर्षी डिसेंबर पासूनच अत्यल्प पाण्याच्या टंचाईची चाहूल लागली होती. दरम्यान, एप्रिल महिन्यात दुष्काळाची दाहकता प्रचंड प्रमाणात वाढली असून सध्या जिल्ह्यातील ४७३ गावे २ हजार ६०६ वाड्यांवरील वस्त्यांना तब्बल १० लाख ७७ हजार १७२ लोकसंख्येला ७०० टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.

पाणी साठण्यास मोठी अडचण

यंदाच्या पावसाळ्यात कमी पर्जन्यमानामुळे निळवंडे आणि भंडारदरा ही दोन धरणे वगळता अन्य कोणतेही धरण पूर्ण क्षमतेने भरू शकले नाही. जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजने अंतर्गत जलसंधारणाची कामे चांगली होऊन देखील पाऊसच नसल्याने पाणी साठण्यास मोठी अडचण झाली आहे. त्यामुळे भूगर्भातील पाणी पातळीत फारशी वाढ झाल्याचे दिसलेच नाही.या पाश्र्वभूमीवर पाणी टंचाईची भीषणता दिवसेंदिवस अधिक वाढत आहे. त्यामुळे एप्रिल महिन्याच्या सुरूवातीलाच टँकरचा आकडा ७०० पर्यंत पोहोचला आहे. ग्रामीण भागात नागरिकांना सध्या कोणताही रोजगार उपलब्ध नसल्याने महिलांच्या बरोबरीने पुरूष देखील गावात येणाऱ्या पाण्याच्या टँकरची वाट पाहातांना दिसतात. संपूर्ण नगर जिल्हा पाणी टंचाई आणि दुष्काळाच्या झळांनी होरपळत असताना श्रीरामपूर तालुक्यात मात्र पाण्याचा एकही टँकर सुरू करावा लागलेला नाही.

पाथर्डी तालुक्यात पाणी टंचाईची स्थिती बिकट

नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात पाणी टंचाईची स्थिती अतिशय बिकट झाली आहे. या पार्श्वभूमीवर पाथर्डी तालुक्यात १०६ गावे ५८८ वाड्या-वस्त्यांवरील २ लाख २४ हजार १७६ लोकांना १३९ टँकरने पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. संगमनेर तालुक्यात ३४ गावे २१५ वाड्या-वस्त्यांवरील ९३ हजार ३०३० लोकांना ४६ टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.

अकोलेमध्ये १ गाव आणि ५ वाड्या वस्त्यांवर १ हजार ८४७ लोकांना ३ टँकर, कोपरगाव मध्ये ३ गावे ३७ वाड्या वस्त्यांवर १० हजार ९५ नागरिकांना ६ टँकर, राहुरीत २ गावांमध्ये ५६२ लोकांना १ टँकर, नेवासेत १९ गावे २९ वाड्या वस्त्यांवरील ४५ हजार १६८ लोकांना ३२ टँकर, राहाता तालुक्यात १ गाव २६ वाड्या वस्त्यांवरील ८ हजार ८५९ लोकांना ४ टँकर, नगर तालुक्यातील ३२ गावे २१८ वाड्या वस्त्यांवरील ७३ हजार ९१८ लोकांना ५६, पारनेर तालुक्यात ७२ गावे ४८० वाड्या वस्त्यांवरील १ लाख ७० हजार ५१० नागरिकांना १३६, शेवगाव तालुक्यात ४० गावे १७१ वाड्या वस्त्यांवरील ६३ हजार ६३८ लोकांना ५५, कर्जतमध्ये ६७ गावे ४२५ वाड्या वस्त्यांवरील १ लाख ३७ हजार २७२ लोकांना ९०, जामखेड मध्ये ३८ गावे ३३ वाड्या वस्त्यांवरील ६६ हजार ८५४ नागरिकांना ८६,लश्रीगोंदा तालुक्यातील ३० गावे २३८ वाड्या वस्त्यांवरील ७६ हजार ५३४ लोकांना ४६, पारनेर नगरपालिकेच्या हद्दीत १ गाव आणि ३५ वाड्या वस्त्यांवर १६ हजार नागरिकांना १६ आणि जामखेड नगरपालिकेच्या क्षेत्रात १ गाव आणि ६ वाड्या वस्त्यांवरील ४५ हजार लोकसंख्येला ३८ पाण्याचे टँकर सुरू आहेत.


वाचा – टँकरची योग्य आकडेवारी जाहीर करा- केशव उपाध्ये


 

First Published on: April 12, 2019 4:08 PM
Exit mobile version