मुंबई – शिंदे-फडणवीस सरकारमधील शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी सरकारी अधिकाऱ्याला केलेल्या मारहाणी वर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत शिंदे गटातील आमदारांना सुनावले. सत्ता आली म्हणजे मस्ती आली का? अशा शब्दात त्यांनी शिंदे गटाच्या आमदारांना जाब विचारला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी अजित पवारांनी केली.
अजित पवार काय म्हणाले –
एका शिंदे गटाच्या आमदाराने सरकारच्या कर्मचाऱ्याला मारहाण केली. म्हणजे तुम्ही कायदा हातात घ्यायला लागला आहात. तुम्ही स्वतःला कोण समजता? सरकार आले म्हणजे काय मस्ती आली का? कोणीही व्यक्ती असली तरी सर्वांना संविधान, कायदे, नियम सारखेच आहेत. नियमांपेक्षा मोठा कोणीही नाही. मग तो सरकारमध्ये असून द्या किंवा महाराष्ट्रातील शेवटचा माणूस, अशा शब्दांत अजित पवार यांनी बांगर यांच्यासह सरकारला खडे बोल सुनावले.
काही आमदार महाराष्ट्रात संघर्ष पेटवा अशी भाषा वापरतायत –
सरकार येऊन काहीच दिवस झाले आहेत तरी यांच्यातील काही आमदार महाराष्ट्रात संघर्ष पेटावा अशी भाषा वापरत आहेत. शिवसेनिकांना ठोकून काढा, त्यांचे हात तोडा, हात तोडता नाही आले तर तंगडी तोडा, अरे ला का रे म्हणा, कोथळा काढा अशी भाषा वापरत आहेत, ही काय पद्धत आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी आपल्याला सुसंस्कृतपणा शिकवला काम करतानाचे संस्कार शिकवले. पण हे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, भाजपला पटत का? असा सवालही त्यांनी केला.
पत्रकार परिषदेत विरोधीपक्षांची भूमिका केली स्पष्ट –
उद्यापासून विधीमंडलाचे अधिवेशन सुरू होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी पक्षाकडून विरोधी पक्षांकडून सरकारच्या चहापाणावर बहिष्कार घालण्यात आला. याचे कारण सांगण्यासाठी अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांकडून कोणते मुद्दे उपस्थित होतील यांची माहिती दिली.