लोककलावंतांसाठी अजित पवारांचा पुढाकार, आर्थिक विकास महामंडळाची मागणी; CM शिंदेंना पाठवलं पत्र

लोककलावंतांसाठी अजित पवारांचा पुढाकार, आर्थिक विकास महामंडळाची मागणी; CM शिंदेंना पाठवलं पत्र

"विचारांची लढाई विचारांनी लढावी..." असा सल्ला अजित पवारांकडून राजकीय पक्षांना देण्यात आलेला आहे.

महाराष्ट्राची लोककला, लोकसंस्कृती असलेल्या तमाशाकलेला लोकमान्यता, राजमान्यता मिळवून देणाऱ्या लोककलावंतांना वृद्धापकाळात सन्मानानं चांगलं जीवन जगता यावं, त्यांच्या निवास, भोजन, औषधोपचारांची सोय व्हावी, लोककलावंतांसाठी वृध्दाश्रम असावेत, त्यांना अल्पव्याजाने कर्ज मिळावे, मुलांच्या शिक्षणाची सोय व्हावी, शासकीय योजनांचा लाभ मिळावा, यासाठी तमाशासम्राज्ञी स्व. विठाबाई नारायणगावकर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य शासनाकडे केली आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधीमंडळ अधिवेशनातील चर्चेवेळी सरकारकडे तमाशासह सर्व लोककलावंतांसाठी महामंडळ स्थापन करण्याची मागणी केली होती. परंतु सरकारकडून प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या मागणीचा पुनरुच्चार केला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणतात की, तमाशा ही महाराष्ट्राची लोककला, लोकसंस्कृती आहे. राज्यातील मागास, अतिमागास समाजातील कलावंतांच्या पिढ्यांनी त्यांच्या त्याग, समर्पणातून ही कला जिवंत ठेवली, वाढवली, समृद्ध केली. तमाशाकलेला लोकमान्यता, राजमान्यता मिळवून दिली. या तमाशा कलावंतांसह राज्यातील समस्त लोककलावंतांच्या मान-सन्मानाकडे, हक्कांकडे, विकासाकडे सरकारने लक्ष देण्याची गरज आहे.

तमाशाकलेला समृद्ध, लोकप्रिय करण्याच्या कार्यात तमाशासम्राज्ञी स्व. विठाबाई नारायणगावकर आणि त्यांच्या कुटुंबियांचं करण्यात मोठे योगदान आहे. त्यांच्या ज्येष्ठ बंधूंना राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे. तमाशाकलेची आयुष्यभर सेवा करणाऱ्या स्व. विठाबाईंचे अखेरचे दिवस हलाखीत गेले. बहुतांश लोककलावंतांच्या वाट्याला हेच दु:ख येते, त्यांच्या आयुष्याचा शेवट हलाखीत जातो. हे टाळण्यासाठी लोककलावंतांसाठी वृध्दापकाळात राहण्याची, जेवण्याची, औषधांची व्यवस्था केली पाहिजे. त्यांच्यासाठी वृध्दाश्रम, अल्प व्याजदरात कर्ज, मोफत आरोग्य सुविधा, मुलांच्या शिक्षणाची सोय असली पाहिजे.

शासनाच्या विकासयोजनांचा लाभ कलावंतांपर्यंत पोहोचवला पाहिजे. त्यासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची गरज आहे. राज्यातील लोककलावंतांकडूनही सातत्याने ही मागणी होत आहे. राज्य शासनाने नुकत्याच घोषित केलेल्या सात महामंडळांबरोबर या महामंडळाचीही घोषणा होईल, ही अपेक्षा होती. परंतु, तसं न घडल्यानं, राज्यातील लाखो लोककलावंतांचा अपेक्षाभंग झाला आहे.

राज्यातील लोककलावंतांची आग्रही मागणी लक्षात घेऊन राज्य सरकारने, लोककलावंतांसाठी तमाशासम्राज्ञी स्व. विठाबाई नारायणगावकर यांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय तातडीने घ्यावा, महामंडळासाठी भरीव आर्थिक तरतूद करावी, महामंडळाचे कामकाज लवकरात लवकर सुरु करुन लोककलावंतांना दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.


हेही वाचा : गोळ्या झाडण्याचे आदेश मॉरिशसमधून नाही तर मातोश्रीवरून, नितेश राणेंचा राऊतांवर


 

First Published on: April 29, 2023 12:22 PM
Exit mobile version