संसदेत खासदारांच्या मौनातून भाजपचा पर्दाफाश, अशोक चव्हाण यांची टीका

संसदेत खासदारांच्या मौनातून भाजपचा पर्दाफाश, अशोक चव्हाण यांची टीका

आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथिल करण्याबाबत महाराष्ट्रातील भाजप खासदारांनी संसदेत बाळगलेल्या मौनातून मराठा आरक्षणाबाबत त्यांच्या दुटप्पी भूमिकेचा पर्दाफाश झाल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विधानांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना ते बोलत होते. अशोक चव्हाण म्हणाले की, भाजपच्या या दोन्ही नेत्यांना आता मराठा आरक्षणावर बोलण्याचा नैतिक अधिकार राहिलेला नाही. १०२ व्या घटना दुरुस्तीनंतर राज्यांना अधिकार राहिलेले नसताना तत्कालीन भाजप सरकारने मराठा आरक्षण दिले, हे सिद्ध झाले आहे. शिवाय ती चूक आता दुरुस्त होत असताना ५० टक्के आरक्षण मर्यादा शिथिल करण्याबाबत महाराष्ट्रातील भाजप खासदारांनी चकार शब्दही काढला नाही.

खासदार संभाजी राजे यांनी याबाबत राज्यसभेत बोलण्यासाठी वेळ मागूनही दुर्दैवाने त्यांना वेळ देण्यात आली नाही. शेवटी विरोधी पक्ष आक्रमक झाले व त्यानंतर त्यांना बोलण्याची संधी देण्यात आली. या साऱ्या प्रकारातून मराठा आरक्षणाबाबत भाजपची दुतोंडी भूमिका उघडी पडली आहे.

आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावरही अशोक चव्हाण यांनी कडाडून टीका केली. भाजप प्रदेशाध्यक्षांनी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल व्यवस्थित वाचला पाहिजे. ५० टक्के आरक्षण मर्यादा हटवण्याची मागणी ही सबब नाही. याच आरक्षण मर्यादेमुळे मराठा आरक्षण फेटाळले गेले, ही वस्तुस्थिती आहे. शिवाय ही मागणी राज्याने आता केलेली नसून, मागील अनेक महिन्यांपासून आम्ही याबाबत सातत्याने बोलतो आहोत. संसदेत राज्यांचे मागासलेपण निश्चित करण्याचे अधिकार पुन्हा बहाल केले जात असताना त्याचवेळी ही मर्यादा देखील शिथिल करावी, अशी मागणी महाविकास आघाडीने लावून धरली. त्यासाठी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खरगे, खासदार अधिर रंजन चौधरी, खासदार डॉ. अभिषेक मनू सिंघवी, खासदार बाळूभाऊ धानोरकर, शिवसेनेचे खासदार संजय राऊत, खासदार विनायक राऊत,खासदार प्रतापराव जाधव, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, यांनी भक्कमपणे बाजू मांडली. मराठा आरक्षणाच्या संसदेतील लढ्याचे ते योद्धे आहे. पण खासदार संभाजी राजे यांचा अपवाद वगळता भाजपचे इतर खासदार हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून बसले होते. लोकसभा व राज्यसभेत काय घडले, ते उभ्या महाराष्ट्राने टीव्हीवर पाहिले. आता भाजपने मराठा समाजाची कितीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तरी ते त्याला बळी पडणार नाहीत, असेही अशोक चव्हाण म्हणाले.

First Published on: August 12, 2021 5:34 PM
Exit mobile version