परमबीर सिंह यांच्या बदलीबाबत मुख्यमंत्र्यांनाच विचारा – शरद पवार

परमबीर सिंह यांच्या बदलीबाबत मुख्यमंत्र्यांनाच विचारा – शरद पवार

मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची बदली होणार आहे की नाही याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारा. कोणाच्या नियुक्ती आणि बदलीबाबत आम्हाला रस नाही, असे सांगताना महाविकास आघाडीत सर्वकाही सुरळीत असल्याचा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. केरळमधील काँग्रेस नेते पीसी चाको यांनी मंगळवारी शरद पवार यांच्या उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानिमित्ताने येथे आयोजित पत्रकार परिषदेत पवार बोलत होते.

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटकांप्रकरणी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या बदलीविषयी चर्चा सुरू आहे. यावर शरद पवार म्हणाले की, परमबीर सिंह यांची बदली होणार आहे की नाही याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारा. कोणाच्या नियुक्ती आणि बदलीबाबत आम्हाला रस नाही.

एका पोलीस अधिकार्‍याच्या तपासाचा परिणाम सरकारवर होईल यावर आमचा विश्वास नाही. एनआयए याचा तपास करत आहे. त्यावेळी आमचे काम आहे त्यांची मदत करणे. ज्या लोकांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर केला आहे, त्यांना त्याची जागा दाखवणे यासाठी एनआयए तपास करणार यात काहीही चुकीचे नाही, असे शरद पवार म्हणाले.

महाराष्ट्र सरकारने हे प्रकरण व्यवस्थित हाताळले आहे, त्यामुळे सगळे एकजूट झाले आहेत. चुकीचे काम करणार्‍या लोकांना शोधले. त्यांचा पर्दाफाश केला आणि सक्तीने पाऊल उचलू शकतो हे दाखवून दिले, असेही शरद पवार यांनी सांगितले.

सचिन वाझे प्रकरण आणि त्यामुळे सरकारच्या प्रतिमेला पोहोचणारी हानी यावरून शरद पवार नाराज असल्याची चर्चा होती. शिवाय यावरून महाविकास आघाडीमध्ये मतमतांतरे असल्याचेही म्हटले जात होते. मात्र, महाविकास आघाडीत कोणतीही अडचण नाही. काही अडचणी येतात, त्यावर एकत्र मिळून तोडगा काढतील, असे शरद पवार म्हणाले.
शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीविषयी बोलताना ते म्हणाले की, आम्ही कायमच भेटतो आणि बोलतो. वेगवेगळ्या मुद्यांवर आमच्यात चर्चा होते.

First Published on: March 17, 2021 4:15 AM
Exit mobile version