रत्नागिरीतील बारसु रिफायनरीप्रकरणी उदय सामंतांनी घेतली शरद पवारांची भेट

रत्नागिरीतील बारसु रिफायनरीप्रकरणी उदय सामंतांनी घेतली शरद पवारांची भेट

रत्नागिरीतील बारसु रिफायनरीचा वाद तापला असून आंदोलकांनी तीन दिवसांचा सरकारला अल्टीमेटम दिला आहे. तीन दिवस प्रकल्पास्थळी सुरू असलेले आंदोलन थांबवण्यात आले आहे. या आंदोलकांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. याच पार्श्वभूमीवर आज शिवसेना नेते आणि राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान बारसु रिफायनरीबाबत चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, कोणतीही राजकीय चर्चा न झाल्याचेही उदय सामंत यांनी सांगितले. (Barsu Refinery case in Ratnagiri Uday Samanta met Sharad Pawar)

शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर उदय सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी “बारसु रिफायनरी येथील आंदोलकांच्या प्रमुखांनी काल शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांची आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची याबाबत चर्चा झाली. त्यानंतर आज मी दुपारी साडेतीन वाजता शरद पवारांची भेट घेतली. या बैठकीत रिफायनीबाबत चर्चा केली. तसेच, यावेळी जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड होते”, असे उदय सामंत यांनी सांगितले.

“आंदोलनकर्त्यांच्या ज्या शंका असतील त्या दूर केल्याशिवाय हा प्रकल्प पुढे जाणार नाही, हा संदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मला दिला होता आणि या मुद्द्यावरच आज शरद पवारांसोबत चर्चा केली. शेतकऱ्यांच्या काही शंका असतील तर, त्या कशाप्रकारे दूर करता येतील, याबाबत चर्चा झाली. तसेच, शेतकऱ्यांवर अन्याय करून, शेतकऱ्यांची चर्चा न करता हा प्रकल्प पुढे नेला जाणार, असा शब्द मी शासनाच्यावतीने शरद पवार यांना दिला”, असेही उदय सामंत यांनी सांगितले.

दरम्यान, बारसु रिफायनरी प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर सरकार स्थानिकांशी, आंदोलकांशी चर्चा करायला तयार आहे. त्यामुळे जोर-जबरदस्ती केली जाणार नाही. सध्या त्या ठिकाणी माती परिक्षण सुरू आहे. त्यानंतर कंपनी ठरवणार आहे की, ही जागा प्रकल्पासाठी योग्य आहे की नाही? याबाबत अधिकची माहिती शरद पवार यांना दिल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.


हेही वाचा – हिंदुत्व नशेच्या व्यापारात अडकले; संजय राऊतांनी भाजप नेत्यांविरुद्ध केली चौकशीची मागणी

First Published on: May 1, 2023 5:36 PM
Exit mobile version