मुंबईत दिवाळीनिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी भाजपा नेते आशिष शेलार यांनी एक पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी दिवाळी पहाट कार्यक्रमावरून आशिष शेलार यांनी वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. जे दुसऱ्यांवर जळतात, ते आनंदाचे दिवे लावणार नाहीत, असा टोला शेलारांनी शिंदे गटाला लगावला आहे.
शेलार म्हणाले की, वरळीच्या मैदानावर आम्ही अतिक्रम केल्याचा आरोप होत आहे. मात्र यात अतिक्रमणाचा कोणताही संबंध नाही. मुंबईकरांच्या मनात काय आहे, हे आम्हाला माहिती आहे. त्यांच्याशी आमची नाळ जुळली आहे. विशेषत: वरळीच्या आमदारांना पेग, पेंग्वीन आणि पार्टी यापुढे काही दिसत नाही. अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे. आदित्य ठाकरे यांनी आजपर्यंत वरळीत मराठी साहित्य, खेळ, लोककला याचा एकही कार्यक्रम आयोजित केला नाही. त्यामुळे त्यांनी आमच्याबद्दल बोलूच नये.
जे दुसऱ्यांवर जळत राहतात, ते आनंदाचे दिवे लावू शकत नाही, त्यामुळे दुसऱ्याच्या अपयशावर ते सतत बोलत असतात आणि वर्तमान पत्रातून लिहित असतात. ते मुंबईत दिवे लावण्याच्या प्रकाश उत्सवाच्या कार्यक्रमात कुठे दिसत नाही. अशा शब्दात शेलारांनी आदित्य ठाकरेंना फटकारले आहे.
उद्धव ठाकरे यांच्या संपत्तीबाबत मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर विचारलेल्या प्रश्नावर शेलार म्हणाले की, न्यायालयात असलेल्या प्रकरणावर मी भाष्य करणार नाही. मात्र ज्यांनी याचिका दाखल केली ते मराठी आहेत. त्यामुळे मुंबईतील मराठी माणसाने उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंद पुकारल्याचे दिसून येत आहे.