राज्यपालांनी राज्यातील परिस्थितीची माहिती राष्ट्रपतींना द्यावी – सुधीर मुनगंटीवार

राज्यपालांनी राज्यातील परिस्थितीची माहिती राष्ट्रपतींना द्यावी – सुधीर मुनगंटीवार

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रामुळे राज्यातील राजकारण चांगलच तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषद घेत राज्यपालांनी राज्यातील परिस्थितीची माहिती राष्ट्रपतींना द्यावी, अशी मागणी केली आहे. ‘मी राष्ट्रपती राजवट लागावी अशी मागणी करत नाही तर सत्याच्या आधारावर घटनेच्या तरतुदींवर राज्यपाल यांनी सत्य कथन असणारा अहवाल तयार करावा आणि राष्ट्रपती यांच्याकडे पाठवावा. तसंच मी राज्यपालांची भेट देखील घेणार आहे, असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं.

गेल्या काही दिवसांपासून जे काही घडतंय ते महाराष्ट्राच्या सन्मानांच्या धिंडवडे काढणाऱ्या घटना आहेत. चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यपालांची वेळ मागून आम्ही देखील राज्यपालांची भेट घेणार आहोत, असं मुनगंटीवार म्हणाले. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकार बेईमानी पद्धतीने आलं, अशी टीका केली.

मुनगंटीवार म्हणाले की, २०१९च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना युतीला बहुमत देत जनतेने मतरुपी आशीर्वाद दिला होता. पण नंतर बेईमानी पद्धतीने महाविकास आघाडी सरकार आलं. जनेतची थट्टा करत जनतेच्या हितासाठी काम करू असं आश्वस्त केलं होतं. पण गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात घडतंय ते धिंडवडे काढणारे आहे.

परमबीर सिंग यांनी पत्राबाबतची सत्य माहिती राष्ट्रपती यांच्याकडे राज्यपालांनी दिली पाहिजे. यासंदर्भात दोन दिवसांनी राज्यपाल यांना भेटायला जाणार आहोत. परमबीर यांनी मुख्यमंत्रीयांच्या सोबत राज्यपाल यांना देखील पत्र लिहिलं आहे. हे गंभीर प्रकरण असले तरी सहजतेने हे प्रकरण घेतले जात आहे. महाराष्ट्राच्या अशा राजकारणात अधिकाऱ्यांनी समोर येत असे काही मंत्री आपल्याला करत असतील तर त्यांनी राज्यपाल यांच्याकडे तक्रारी पाठवाव्यात. शपथ घेतलेले मंत्री जर आकस भाव दाखवत असतील तर घटनेच्या आधारावर राज्यपाल महोदयांनी राज्याची संपूर्ण परिस्थितीची माहिती राष्ट्रपती यांना पाठवावी, असं मुनगंटीवार म्हणाले.

तसेच सुधीर मुनगंटीवार पुढे ण्हणाले की, मी राष्ट्रपती राजवट लागावी अशी मागणी करत नाही तर सत्याच्या आधारावर घटनेच्या तरतुदींवर राज्यपाल यांनी सत्य कथन असणारा अहवाल तयार करावा आणि राष्ट्रपती यांच्याकडे पाठवावा. उद्या महाराष्ट्रात आतंकवाद अशी घटना झाली तर महाराष्ट्र सरकार जबाबदार असेल.


हेही वाचा – महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याऐवजी केंद्र सरकारच बरखास्त केलं पाहिजे – संजय राऊत


 

First Published on: March 22, 2021 12:10 PM
Exit mobile version