भाजपने ती निवडणूक लढवू नये; राज ठाकरेंची उपमुख्यमंत्री फडणवीसांना पत्राद्वारे विनंती

भाजपने ती निवडणूक लढवू नये; राज ठाकरेंची उपमुख्यमंत्री फडणवीसांना पत्राद्वारे विनंती

अंधेरी पोटनिवडणवुकीवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेय. या निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके आणि भाजपा, शिंदे गटाकडून मुरजी पटले यांना उमेदवारी देण्यात आली. या दोघांनी मोठे शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला. दरम्यान या पोटनिवडणुकीत मनसे काय भूमिका याकडे अनेकांचे लक्ष होते. परंतु आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. राज ठाकरेंनी एका पत्राद्वारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ही निवडणूक न लढवण्याचे आवाहन केले आहे. या पत्रातून राज ठाकरेंनी अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून भाजपने आपला उमेदवार मागे घ्यावा आणि भाजपने ही निवडणूक लढवू नये, असं आवाहन केले आहे.

राज ठाकरे यांचे पत्र

एक विशेष विनंती करण्यासाठी हे पत्र आपणांस लिहितो आहे. आमदार कै रमेश लटके ह्यांच्या दुर्देवी निधनानंतर आज अंधेरी (पूर्व) ह्या विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक आहीर झाली आहे. तिथे त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके ह्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. कै. रमेश एक चांगले कार्यकर्ते होते. अगदी शाखा प्रमुखापासून त्यांची वाटचाल सुरू झाली. त्यांच्या राजकीय प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीनं आमदार होण्यानं कै. रमेश ह्यांच्या आत्म्यास खरोखर शांती मिळेल. माझी विनंती आहे की भारतीय जनता पक्षानं ती निवडणूक लढवू नये आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके आमदार होतील हे पहावं.

मी आमच्या पक्षातर्फे अशा परिस्थितीत जेंव्हा दिवंगत आमदाराच्या घरच्या व्यक्ती निवडणूक लढवतात तेंव्हा शक्यतो निवडणूक न लढवण्याचं धोरण स्वीकारतो. तसं करण्याने आपण त्या दिवंगत लोकप्रतिनिधीला श्रद्धांजलीच अर्पण करतो अशी माझी भावना आहे. आपणही तसं करावं असं मला माझं मन सांगतं. असं करणं हे आपल्या महाराष्ट्राच्या महान संस्कृतीशी सुसंगतही आहे. मला आशा आहे आपण माझ्या विनंतीचा स्वीकार कराल, अस मला माझं मन सांगतं, असंही राज ठाकरेंनी पत्रात नमूद केले.


मुंबई आणि ठाण्यात कुष्ठरोग वाढतोय, 30 रुग्णांमुळे धोक्याची घंटा

First Published on: October 16, 2022 2:05 PM
Exit mobile version