भाजपचे पाच वर्षात काम कमी,मार्केटिंग जास्त

भाजपचे पाच वर्षात काम कमी,मार्केटिंग जास्त

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मागच्या सरकारच्या कारभारावर आणि योजनांवर सडकून टीका केली आहे. मागील पाच वर्षात भाजप सरकारने मागेल त्याला शेततळे, जलयुक्त शिवार या योजनांवर काम केले. मात्र या सर्व योजना थेट लोकांपर्यंत पोहचल्याच नाहीत. भाजपने काम कमी केले आणि कामांंचे मार्केटिंगच जास्त केले, अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे. अमरावती येथे आयोजित परिसंवाद कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेत रोहित पवार बोलत होते.

जलयुक्त शिवारावर 6-7 हजार कोटींवर खर्च मागील सरकारने केला. मात्र या योजनांमध्ये केलेल्या कामाची आजची स्थिती वाईट आहे. त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. या योजनांमागे विचार चांगला होता, मात्र त्याची अंमलबजावणी योग्य झाली नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारमध्ये असताना एक योजना (इंटिग्रेटेट वॉटर शेड) होती, ती बदलून भाजप सरकारने नवी योजना सुरू केली. मात्र त्याची अंमलबजावणी योग्य झाली नाही म्हणून लोकांना त्याचा फायदा झाला नाही, असे रोहित पवारांनी म्हटले.

मागेल त्याला शेततळे 50 हजार रुपयात दिले गेले. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. तेवढ्या पैशात काहींची शेततळी तयारही झाली नाहीत. शेततळे तयार करण्यासाठी पाणी टाकायला प्लास्टिक कागद लागते. फक्त आकडे वाढवण्यासाठी शेततळी देण्यात आली. अनेकांना कागद मिळालेही नाही. पण त्या शेततळ्यात पाणी टाकल्यावर त्यामध्ये पाणी राहत नव्हते, असा आरोप रोहित पवार यांनी केला.

First Published on: January 28, 2020 6:05 AM
Exit mobile version