प्रत्येकाचे स्वप्न असते, आपले स्वत:चे असे घर असावे आणि ते घर खरेदी करण्यासाठी ती व्यक्ती मेहनत घेऊन आयुष्य भराची पुंजी जमा करते. ती जमा केलेली पुंजी एखाद्या बिल्डरला देऊ करुन घर खरेदी करते. मात्र, बऱ्याचदा पैसे दिल्यानंतर ते घर आपले झालेच नाही. आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येते. त्यानंतर अनेक जण आपली फसवणूक झाल्याचे सांगत पोलीस स्थानकात तक्रार करण्यासाठी जातात. मात्र, त्याचा काहीही फायदा होत नाही. कारण कायद्यात याबाबत काहीच तरतूद नसल्यामुळे त्यावर कारवाई होऊ शकत नाही. मात्र, आता असे झाले तर काळजी करु नका, कारण रेराच्या नव्या कायद्यानुसार तुमची अशी फसवणूक होणार नाही.
काय आहे नवा कायदा?
रेरा (RERA) कायद्यात महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. आव्हाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, यापुढे कुठल्याही बिल्डरला एक फ्लॅट अनेकांना विकून फसवणूक करता येणार नाही. याआधी बिल्डर एक फ्लॅट अनेकांना विकून त्यांच्याकडून पैसे घेऊन त्यांची फसवणूक करत असे. अशा एकना अनेक तक्रारी आमच्याकडे देखील यायच्या. मात्र, याबाबत कायद्यात तरतूद नसल्यामुळे काहीच करता येत नव्हते. त्यामुळे आता रेरा कायद्यात बदल करत एखाद्या बिल्डरने एक फ्लॅट अनेकांना विकल्यास त्याच्यावर कारवाई होणार आहे.
सांगितल्याप्रमाणे RERA कायद्यात बदल केला असून यापुढे कुठल्याही विकासकाला एक फ्लॅट अनेक जणांना विकून फसवणूक करता येणार नाही. कायद्यातच बदल केल्याने कायद्याच्या चौकटीत आता विकासकांना राहावेच लागेल. RERA चे Controlling Authority श्री. अजोय मेहता यांचे आभार! pic.twitter.com/zxpS2Apamj
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 9, 2021
बिल्डरला हे करणे बंधनकारक
एखादा फ्लॅट विकल्यानंतर त्याची संपूर्ण माहिती बिल्डरला रेरा कायद्यानुसार ऑनलाईन करणे बंधनकारक असणार आहे. त्यामुळे एखादा फ्लॅट कुणाला विकला गेला असेल, तर त्याची माहिती सहज उपलब्ध होणार. त्यामुळे या कायद्याअंतर्गत आता ग्राहकांची फसवणूक होणार नाही. तसेच याची फसवणूक करण्याचा प्रयत्न झाल्यास बिल्डरला कायद्यातील बदलानुसार अटक देखील केली जाऊ शकते. त्यामुळे आता सर्वसामान्यांची होणारी फसवणूक रोखण्यास मदत होईल, असे मत आव्हाड यांनी व्यक्त केले आहे.
हेही वाचा – दुर्दैवी घटना: नागपूरच्या कोविड ‘वेल ट्रिट’ रुग्णालयाला आग; ४ जणांचा मृत्यू