भाजप हा देशाला जडलेला कॅन्सर – अशोक चव्हाण

भाजप हा देशाला जडलेला कॅन्सर – अशोक चव्हाण

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची अमरावती येथे सभा

“भारतीय जनता पक्ष हा देशाला जडलेला कॅन्सर आहे. आगामी निवडणुकांत हा कॅन्सर मुळापासून उखडून टाकला नाही तर देशाचे वाटोळे होईल. या देशातील लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी भाजपरूपी कॅन्सरवर शस्त्रक्रिया करू त्याला मुळासकट उखडून टाकले पाहिजे”, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. काँग्रेस पक्षाच्या राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेच्या चौथ्या टप्प्याच्या दुसऱ्या दिवशी अमरावती जिल्ह्यात गावोगावी नागरिकांनी जनसंघर्ष यात्रेचे जंगी स्वागत केले. त्यानंतर मोर्शी आणि चांदूर बाजार येथील विराट जनसंघर्ष सभेला संबोधित करताना चव्हाण यांनी केंद्र आणि राज्यातील भाजप शिवसेना सरकारवर जोरदार टीका केली.

मिशेलच्या अटकेमुळं सत्य समोर येईल – अहमद पटेल

“भाजप शिवसेना सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी उद्धवस्त झाला आहे. कर्जमाफीची घोषणा करून एक वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला. पण अद्याप शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. कर्जमाफी नाही म्हणून नविन पीक कर्ज मिळत नाही. शेतकऱ्यांनी पीक विम्याचे हप्ते भरले पण विम्याची रक्कम काही मिळाली नाही. काही ठिकाणी विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना १ रूपया, २ रूपये. ५ रूपये अशी भरपाई दिली. ही शेतकऱ्यांची क्रूर थट्टा असून पीक विमा योजना शेतकरी लूट योजना झाली आहे, असे खासदार अशोक चव्हाण म्हणाले.

राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. खरीप वाया गेले आहे. रब्बीची पेरणी झाली नाही. लोकांना प्यायला पाणी नाही. जनावरांना चारा नाही. आता स्वतः काय खायचे? पशुधन कसे जगवायचे? या विवंचनेत शेतकरी आहेत. काँग्रेस पक्षाने जनसंघर्ष यात्रेच्या माध्यमातून सरकारवर दबाव टाकला म्हणून सरकारने दुष्काळ जाहीर केला. पण अद्याप दुष्काळी उपाययोजना सुरु केल्या नाहीत. राज्यात रोज शेतकरी आत्महत्या करत आहेत. साडेचार वर्ष झाली पण मुख्यमंत्र्यांचा अभ्यासच संपला नाही. राज्य चालवण्यात ते नापास झाले आहेत, असेही खासदार चव्हाण म्हणाले.

राज्याच्या दुरावस्थेला भाजप इतकीच शिवसेनाही जबाबदार आहे. शिवसेना सत्तेसाठी लाचार आहे. साडेचार वर्षात काही काम केले नाही. जनतेतकडे जाऊन मते मागायला तोंड नाही, त्यामुळे आता रामाच्या नावाने राजकारण करण्याचा प्रयत्न भाजप शिवसेनेकडून सुरु आहे. राज्यात रोज शेतकरी मरत असताना उद्धव ठाकरे अयोध्येत जाऊन राम मंदिराच्या वल्गना करत आहेत. उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा हा पब्लिसीटी स्टंट होता, असा टोला चव्हाण यांनी लगावला. एमआयएम ही भाजपची बी टीम असून राजकीय फायद्यासाठी भाजप हिंदू, मुस्लीम आणि दलितांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. या कामात ओवेसी भाजपची मदत करत आहेत असे खा. चव्हाण म्हणाले.

या सभेला मार्गदर्शन करताना राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, भाजप सरकारने अर्थव्यवस्थेचे वाटोळे केले आहे. नोटाबंदीच्या तुघलकी निर्णयामुळे देशातील उद्योगधंद्यांची वाताहत झाली असून बेरोजगारी वाढली आहे. सरकारकडे आर्थिक नियोजन नसल्याने करवाढ करून लोकांची लूट सुरु आहे.

First Published on: December 5, 2018 9:45 PM
Exit mobile version