राज्य सरकार कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंध देखील लागू केले आहेत. मात्र, असे असताना देखील राज्यातील कोरोनाची परिस्थिती जैसे ते थै आहे. त्यामुळे बऱ्याच शहरात ऑक्सिजन बेडसह व्हेंटिलेटर बेड्सची आवश्यकता भासत आहे. नाशिक, पुणे, नागपूर, सातारा आणि औरंगाबाद याठिकाणी देखील दिवसागणिक कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत मोठी वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर देखील त्याचा ताण आला आहे. दरम्यान, केंद्राने औरंगाबाद जिल्ह्यातील कोविड रुग्णांसाठी १०० व्हेंटिलेटर बेड्स पाठवले आहेत. व्हेंटिलेटरच्या साहित्याचा ट्रक घाटीमध्ये दाखल झाला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांमार्फत होणार विभागणी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून औरंगाबाद जिल्ह्यातील कोविड रुग्णांसाठी शंभर व्हेंटिलेटर देण्याचे यापूर्वीच जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार व्हेंटिलेटरचे साहित्य असलेला ट्रक घाटी परिसरात दाखल झाला आहे. तसेच संबंधित उपकरणांची आणखी काही साहित्य येणे बाकी आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात ती साहित्य देखील दाखल होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आआहे. दरम्यान, शंभर व्हेंटिलेटरची विभागणी ही जिल्हाधिकाऱ्यांमार्फत होणार आहे. यामध्ये घाटी, सामान्य रुग्णालय आणि इतर कोविड केअर सेंटरचा देखील समावेश असणार आहे. विशेष म्हणजे सध्याची परिस्थिती पाहून आणि रुग्णांची गरज पाहून त्याप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांकडून त्या दृष्टीने निर्णय घेण्यात येणार आहे.
गेल्या २४ तासांत राज्यात ५१ हजार ७५१ नवीन रुग्ण आढळले असून २५८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३४ लाख ५८ हजार ९९६वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ५८ हजार २४५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ५२ हजार ३१२ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत राज्यात आजपर्यंत एकूण २८ लाख ३४ हजार ४७३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८१.९४ एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.६८% एवढा आहे.
हेही वाचा – मराठवाड्यासह, सांगली, कोल्हापूरमध्ये येत्या ३ दिवसात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता