नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता

नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता

नाशिक । वातावरणातील चढ उतारामुळे सध्या नाशिककरांना ऐन थंडीत पावसाळयाचा अनुभव येत आहे. नाशिक शहरासह जिल्हयाच्या विविध भागात आज ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. अरबी समुद्राचा वायव्य भाग ते उत्तर पंजाब या दरम्यान कमी दाबाचा पटटा सक्रिय आहे तर गुजरात व राजस्थानच्या नैॠत्य भाग आणि सौराष्ट्र या भागात चक्रिवादळासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे ५ ते १२ जानेवारी दरम्यान राज्यात नाशिकसह उत्तर महाराष्ट्र तसेच विविध भागात हलक्या स्वरूपाचा पाउस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

पावसाळयाच्या सुरवातीला निसर्ग चक्रीवादळ आणि ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये अवकाळी पावसाचा फटका या हवामान बदलामुळे सध्या वातावरणात मोठया प्रमाणात चढ उतार बघायला मिळत आहे. डिसेंबरमध्ये तापमानात ८ अंशापर्यंत घट झाली. परंतु गेल्या तीन चार दिवसांपासून तापमानाचा पारा १८ अंशापर्यंत जाउन पोहचला आहे. त्यामुळे यंदा नोव्हेंंबरपासून ढगाळ वातावरण, उकाडा आणि थंडी असा अनुभव सध्या नाशिककरांना येत आहे. आज सकाळपासूनच नाशिकमध्ये ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. तापमानाचा पारा वाढूनही हवेत अधिक गारवा निर्माण झाला आहे. पश्चिमेकडून येणारे बाष्पयुक्त वारे देशभरात अनेक ठिकाणी पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्र तसेच विविध भागात हलक्या पाऊस होऊ शकतो असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. बदलत्या हवामानामुळे पिकांचं नुकसान होईल या भितीने बळीराजा चिंतीत आहे.

जम्मू, काश्मीर आणि लदाख आदी भागांत मोठया प्रमाणात बर्फवृष्टी होत आहे. कडाक्याची थंडी पडली आहे. दिल्लीचे तापमानाचा पारा 1 अंश सेल्सिअस पर्यंत खाली उतरले आहे. राजस्थान मध्ये माऊंट अबूचे तापमान उणे 4.4 अंश सेल्सिअस इतके कमी झाले आहे. दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशचा काही भाग येथे गारपीट व पाऊस झाला आहे व सुरू आहे. अशावेळी महाराष्ट्र राज्यात ढगाळ वातावरण व दाट धुके पडले आहे. अनेक ठिकाणी दवबिंदू दिसून येत आहेत. यामागे अफगाणिस्तानकडून येणारे पश्चिमी वारे म्हणजे वेस्टर्न डिस्टर्बन्स हे वैज्ञानिक कारण आहे. राज्यात येत्या आठवड्यात कुम्युलोनिबंस ढगांची निर्मिती झाल्यानंतरच पाऊसाबरोबर गारा पडू शकतात. ५ ते १२ जानेवारी दरम्यान पाउस पडू शकतो. परंतु शेतकरयांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. तूर, द्राक्ष, कांदा पीक तयार झाले असेल तर काढणी करून ती सुरक्षित ठिकाणी साठवावीत. तसेच देशी बियाणे व सेंद्रिय खतांचा वापर करावा.
प्रा किरणकुमार जोहरे हवामान तज्ज्ञ

First Published on: January 4, 2021 12:25 PM
Exit mobile version