मोदी-फडणवीसांच्या भाषणांवरही टॅक्स लावा – अशोक चव्हाण

मोदी-फडणवीसांच्या भाषणांवरही टॅक्स लावा – अशोक चव्हाण

काँग्रेस पक्षाची राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा

कोल्हापूर शेतकऱ्यांच्या विहिरीतल्या पाण्यावर टॅक्स लावणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भाषणांवरही टॅक्स लावला पाहिजे, असा घणाघात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे.

का केली अशी बोचरी टीका?

काँग्रेस पक्षाची राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा शनिवारी कोल्हापूर जिल्ह्यातील चोकाक येथे पोहोचली. या यात्रेचे सांगली फाटा येथे भव्य दुचाकी रॅलीने स्वागत देखील केले. त्यानंतर चोकाक येथे आयोजित सभेत अशोक चव्हाण यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली. राज्यातले आणि केंद्रातले भाजप सरकार शेतकरी विरोधी आहे. स्वातंत्र्य भारताच्या इतिहासात शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या ट्रॅक्टरवरच्या सुट्या भागांवर आणि इतर शेती अवजारांवर जीएसटी लावणाऱ्या सरकारने आता शेतकऱ्यांच्या विहिरीतल्या पाण्यावर देखील टॅक्स लावला आहे. त्यामुळे खोटी आश्वासने देऊन जनतेची फसवणूक करणाऱ्या मोदी फडणवीसांच्या भाषणांवरही टॅक्स लावा पाहिजे अशी टीका अशोक चव्हाण यांनी केली आहे.

इंधनावर कर लावून सर्वसामान्यांची लूट

काँग्रेस सरकारच्या काळात विकासात अग्रेसर असलेल्या महाराष्ट्राची भाजप शिवसेना सरकारने अधोगती केली आहे. शेतीमालाला भाव नाही. कर्जमाफी मिळाली नाही. शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नाही. नुकसानीची मदत मिळत नाही. जनतेला मदत कऱण्याऐवजी सरकार इंधनावर कर लावून सर्वसामान्यांची लूट करीत आहे. त्याचबरोबर नोटाबंदी आणि जीएसटीमुळे या भागातील पॉवरलूम व्यवसाय अडचणीत आला आहे. हजारो लोकांचा रोजगार देखील गेला आहे. भाजप शिवसेना सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सर्वच घटक अडचणीत आले आहेत. तसेच राज्यावर पाच लाख कोटींच्या कर्जाचा डोंगर करून ठेवला आहे. भाजप शिवसेनेला जनतेच्या प्रश्नांची जाणच नाही त्यामुळे ते प्रश्न सोडवूच शकत नाहीत. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुन्हा काँग्रेसचेच सरकार आणले पाहिजे त्यासाठीच हा जनसंघर्ष सुरु असून भाजप शिवसेनेला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय थांबणार नाही अशी सडकून टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केली आहे.

First Published on: September 1, 2018 4:08 PM
Exit mobile version