नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरमध्ये उरुस दरम्यान इतर धर्मियांकडून त्र्यंबकेश्वर मंदिरात बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न केल्याची घटना काल, 15 मे रोजी घडली. या प्रकरणाची शासनाने गंभीर दखल घेत आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी स्थापनेचा आदेश दिला आहे. त्यानंतर आता या संपूर्ण प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. ( Chief Minister Eknath Shinde s first reaction on the Trimbakeshwar case )
मुख्यमंत्री म्हणाले की, कायदा व सुव्यवस्था राखणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे पण लोकांनीही सहकार्य केले पाहिजे. प्रत्येक समाजातील लोकांनी पुढे येऊन शांतता राखली पाहिजे, असं मत नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील घटनेवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं आहे.
तसचं, राज्यात सर्व जातीपातीची लोक राहतात. कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाही. कुठलेही तणावपूर्ण वातावरण राहणार नाही. कायदा व सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.
गृहमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
त्र्यंबकेश्वर मंदिरात दुसऱ्या धर्माच्या गटाने प्रवेशाची मागणी केल्यावरुन वाद निर्माण झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटांना समज देत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. तसचं, संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी पुरोहित संघाने केली आहे. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करण्याकरता एसआयटी स्थापना करण्याचे आदेश गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
( हेही वाचा: त्र्यंबकेश्वर मंदिरात घडलेला प्रकार गंभीर; SIT स्थापन करण्याचे गृहमंत्र्यांचे आदेश )