आरोग्यसेवकांनो… राज्य संकटात, महाराष्ट्राला तुमची गरज – मुख्यमंत्री

आरोग्यसेवकांनो… राज्य संकटात, महाराष्ट्राला तुमची गरज – मुख्यमंत्री

लाभार्थ्यांची यादी कुठे आहे?, काँग्रेस नेत्याचा मुख्यमंत्र्यांना सवाल

राज्यातील चिंताजनक झालेली परिस्थिती पाहता, महाराष्ट्रातील आरोग्यसेवकांना मुख्यमंत्र्यांनी एक कळकळीची अशी विनंती केली आहे. राज्यात कोरोनामुळे भीषण होत चाललेली परिस्थिती पाहता राज्यातल्या सेवानिवृत्त झालेल्या डॉक्टर, नर्सेस यांनी राज्यावर ओढावलेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी मदतीला यावे अशी कळकळीची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर आणि संघटना, प्रसारमाध्यमे तसेच तज्ञांसोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांची राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता दिसणारी हतबलता दिसून आली. ते आज वृत्तपत्रांचे संपादक, मालक, वितरक यांच्याशी दुरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत बोलत होते. याप्रसंगी आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, सचिव सीताराम कुंटे, आरोग्य प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास आदींची उपस्थिती होती. राज्यात कोरोनाच्या झालेल्या विस्फोटामुळेच आरोग्य यंत्रणा आता दमली आहे याची कबुली मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी जनतेसोबत संवाद साधताना स्पष्ट केली होती. त्यामुळे कोरोनाच्या संकटाच्या सामना करताना आरोग्य यंत्रणेवर वाढलेला ताण पाहता मुख्यमंत्र्यांनी डॉक्टर, नर्सेस आणि आरोग्य कर्मचारी तसेच आरोग्य सेवकांना राज्यासाठी योगदान देण्याचे आवाहन केले होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याआधीच आरोग्य सेवा वाढवताना हॉस्पिटल म्हणजे फर्निचरच्या दुकानासारख खोलता येत नाही, असा खुलासा केला होता. उद्योगमंत्री आनंद महिंद्रा यांनी केलेल्या लॉकडाऊनच्या वक्तव्याचाही मुख्यमंत्र्यांनी समाचार घेतला होता. राज्यातील अनेक आरोग्यसेवक, डॉक्टर आणि नर्स हे कोरोनाग्रस्त झाले होते. त्यांच्यापैकी अनेक डॉक्टर, नर्सेस आणि आरोग्य सेवक हे यंत्रणेसाठी पुन्हा काम करण्यासाठी उतरले आहेत. पण राज्यातील आरोग्य यंत्रणा दमलेली आहे, असाही खुलासा मुख्यमंत्र्यांनी केला होता. त्यामुळेच राज्यातील आरोग्याची यंत्रणा सुधारण्यासाठी उद्योगपतींनी काही द्यायचे असेल तर डॉक्टर आणि नर्सेस यासारखे आरोग्य कर्मचारी द्या असेही आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. म्हणूनच आरोग्य यंत्रणेला आता सहकार्याची गरज आहे.

कोरोना प्रतिबंध करण्यासाठीच्या निर्बंधांच्या मुद्द्यावर विरोधकांना रस्त्यावर उतरून कोरोनाविरोधातील लढाईत उतरण्याचेही मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले होते. तसेच कोरोनाच्या मुद्द्यावर जनतेच्या जिवाशी खेळू नका असेही आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले होते. राज्यातील कोरोनाच्या प्रतिबंधासाठी आज शनिवारी झालेल्या बैठकीत राज्यात लॉकडाऊन लावायचा की नाही याबाबतची मुख्यमंत्र्यांनी समाजातील विविध घटकांना विचारणा केली. राज्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ज्याकाही उपाययोजना कराव्या लागतील त्यासाठी मला तुमची साथ हवी आहे असेही आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले होते. त्यामुळेच येत्या दिवसात राज्यात कोरोनावर कडक प्रतिबंध करण्यात येतील असेच संकेत मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले आहेत.

राज्यातील कोरोनाची वाढती रूग्णसंख्या पाहता राज्यात सध्या ऑक्सिजनच्या पुरवठ्याची अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळेच ऑक्सिजनच्या आव्हानासाठी उपाययोजना करण्याचे आव्हान हे येत्या दिवसात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. आपण ऑक्सिजन उत्पादन कसे वैद्यकीय कारणांसाठी राखून ठेवता येईल, खासगी व बंधपत्र –करार स्वरूपाने डॉक्टर्सच्या सेवा कशा उपयोगात आणता येईल त्याचाही विचार करीत आहोत. ज्येष्ठ डॉक्टर्स, नर्सेस यांच्या सेवाही कशा घेता येतील, ई आयसीयुचा उपयोग कसा करता येईल तेही पाहतो आहोत असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, जनतेचे हित पाहूनच सरकारने भविष्यात काही निर्णय घेतल्यास माध्यमांनी देखील त्यामागील हेतू पहावा व वस्तुस्थिती मांडावी, असेही आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.


 

First Published on: April 3, 2021 7:43 PM
Exit mobile version