‘भारत जोडो यात्रे’चे नांदेड प्रभारी काँग्रेस नेते नसीम खान यांच्या गाडीचा अपघात

‘भारत जोडो यात्रे’चे नांदेड प्रभारी काँग्रेस नेते नसीम खान यांच्या गाडीचा अपघात

काँग्रेस पक्षाच्या मुंबईतील प्रमुख चेहऱ्यांपैकी एक असलेले माजी केंद्रीय मंत्री नसीम खान यांच्या गाडीचा नांदेडमध्ये अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. शनिवारी हा अपघात झाला असून, नांदेडच्या भिलोली टोलनाक्यावर झाला. नसीम खान हे राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेसाठी हैदराबादहून नांदेडच्या दिशेने जात होते. त्यावेळी नसीम खान यांच्या गाडीला अपघात झाल्याचे समजते. या अपघातात नसीम खान यांच्या पायाला दुखापत झाल्याचे समजते. मात्र ही दुखापत किरकोळ असून, ते भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. (Congress Leader Naseem Khan Car Accident In Nanded Before Rahul Gandhi Bharat Jodo Yatra)

7 नोव्हेंबर सोमवारी राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. त्याच तयारीसाठी नसीम खान नांदेडच्या दिशेने जात होते. त्यावेळी त्यांच्या गाडीला अपघात झाला. नसीम खान यांच्या कारला एका दुसऱ्या कारने समोरून धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, दोन्ही कारच्या बोनेटचा भाग पूर्णपणे चेपला गेला आहे. या अपघातात नसीम खान यांच्या गाडीचा चालक बऱ्यापैकी जखमी झाला आहे.

दरम्यान, नसीम खान हे नांदेड जिल्ह्यातील भारत जोडो यात्रेचे प्रभारी असून, राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रातील भारत जोडो यात्रेचे व्यवस्थापन हे एच.के.पाटील आणि अशोक चव्हाण करत असले तरी नांदेडची जबाबदारी नसीम खान यांच्यावर आहे.

नसीम खान यांच्या अपघाताचे वृत्त समजताच एच. के. पाटील, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, माजी कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात व इतर ज्येष्ठ नेत्यांनी फोन करून त्यांची विचारपूस केली. यावेळी त्यांनी पायाच्या दुखापतीनंतरही भारत जोडो यात्रेत सहभागी होणार असल्याचे सांगितले.


हेही वाचा – ‘नटी’ म्हणून उल्लेख, सुषमा अंधारेंवर टीका करताना गुलाबराव पाटलांनी पातळी सोडली

First Published on: November 6, 2022 10:35 AM
Exit mobile version