मिरवणुका, मोर्चे, यात्रांवर बंदी असतानाही उस्मानाबादमध्ये शेतकऱ्यांचा मोर्चा

मिरवणुका, मोर्चे, यात्रांवर बंदी असतानाही उस्मानाबादमध्ये शेतकऱ्यांचा मोर्चा

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (२१ फेब्रुवारी) जनतेशी संवाद साधला. त्यावेळेस राज्यात आजपासून (२२ फेब्रुवारी) राजकीय, सामाजिक मिरवणुका, मोर्चे, यात्रांवर बंदी असणार आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेकडे उस्मानाबादमध्ये दुर्लक्ष केल्याचे चित्र समोर आले आहे. मोर्चे, आंदोलनाला बंदी असूनही उस्मानाबादमधील शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. तेरणा शेतकरी साखर कारखाना सुरू करावा, या मागणीसाठी शेकडोच्या संख्येने शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. पण या मोर्चामध्ये कोरोना नियमांचा फज्जा उडवल्याचे समोर आले आहे.

गेल्या १० वर्षांपासून बंद असलेला तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना सुरू करण्याच्या मागणीसाठी उस्मानाबादचे शेतकरी आज रस्त्यावर उतरले. पण या मोर्चामध्ये शेतकरी कोरोना संदर्भातील नियमांचे पालन करताना दिसले नाहीत. अनेक शेतकऱ्यांनी चेहऱ्यांवर मास्क लावला नव्हता, तर मोर्चामध्ये सोशल डिस्टन्सिंग पालन देखील केले जात नव्हते.

माहितीनुसार, या मोर्चाचे नियोजन गेल्या महिन्याभरापासून सुरू होते. मराठवाड्यातील हा महत्त्वाचा कारखाना आहे, जिथे पहिल्यांदा सहकारी पद्धतीने साखरेच उत्पादन झाले. या मोर्चामध्ये कोणतीही राजकीय भूमिका नव्हती. पण कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन या मोर्चाची तारीख पुढे ढकलली जाऊ शकत होती. पण तसे काही झाले नाही आणि मुख्यमंत्र्यांच्या कालच्या आवाहनाला उस्मानाबादमधील शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही.


हेही वाचा – त्रीसुत्री पाळा व लॉकडाऊन टाळा, राजेश टोपेंचे राज्यातील जनतेला कळकळीचे


 

First Published on: February 22, 2021 3:56 PM
Exit mobile version