‘गायिका कनिका कपूरचे वागणे माणुसकीला काळीमा फासणारे’

‘गायिका कनिका कपूरचे वागणे माणुसकीला काळीमा फासणारे’

कनिका कपूर

बॉलिवूड मधील प्रसिद्ध गायिका कनिका कपूर हिला करोनाची लागण झाली आहे. मात्र तिला करोनाची लागण झाली असल्याचं माहित असूनही तिने पार्टीचे आयोजन केले होते. त्या पार्टीमध्ये पाचशे लोक असल्याचं म्हटलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राज राजपूरकर यांनी कनिका कपूरच्या वागण्यावर खंत व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, गायिका कनिका कपूरचे वागणे हे अत्यंत बेजबाबदारपणाचे, माणुसकीला काळीमा फासणारे आहे. आज समाजामध्ये, राज्यांमध्ये, देशांमध्ये सगळीकडे भीतीचे वातावरण पसरले असताना, आज सगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री देशाचे प्रधानमंत्री हे देखील जनतेला लढण्याचे आणि करोनाला हरवण्याचे आव्हान करत आहेत. सगळ्यांनी एकजुटीने एका विश्वासाने राज्याकडून देण्यात येणाऱ्या सगळ्या सूचनांचे अगदी काटेकोरपणे पालन करून करोनाला देशाच्या बाहेर हद्दपार करण्याची जबाबदारी घ्यायची आहे. या जबाबदारीमध्ये सिने अभिनेते अमिताभ बच्चन, अनिल कपूर, अक्षय कुमार, शिल्पा शेट्टी, सोनाली कुलकर्णी, सचिन तेंडुलकर सर्व सेलिब्रिटी राजकीय पुढारी राजकीय नेते पुढे येऊन समाजाला घरी राहून करोनापासून वाचण्याचा असा संदेश देत आहेत. करोना दूर ठेवण्यासाठी आवश्यक ते सामाजिक संदेश देत आहेत.’

आरोग्य मंत्री राज्यातल्या जनतेसाठी जीवाची बाजी लावून काम करत

पुढे ते म्हणाले की, ‘आरोग्य मंत्री सारखे राजकीय नेते स्वतःचे वैयक्तिक कौटुंबिक प्रॉब्लेम असताना देखील ते बाजूला ठेवून राज्यातल्या आणि देशातल्या जनतेसाठी जीवाची बाजी लावून काम करत आहेत. देशातल्या, राज्यातल्या जवळजवळ सगळ्या छोट्या आणि मोठ्या कंपन्या ऑफिसला बंद करण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत जेणेकरून प्रत्येकाने आपापल्या घरी राहून आपली स्वतःची काळजी घ्यावी. कोणतीही गर्दी होऊ नये यासाठी जवळजवळ सगळे मंदिरे, मस्जिद, गुरुद्वारे, चर्च बंद ठेवण्यात आलेले आहेत. दुकाने, मॉल, हॉटेल्स, पार्क, गार्डन, आयटी सगळे बंद करण्यात आलेले आहे.’


नक्की वाचा – Coronavirus: करोनाची लागण होऊन सुद्धा ‘या’ प्रसिद्ध गायिकेने केली पार्टी


सामान्य माणूस स्वतःच्या रोजगाराची पर्वा न करता नियमांचे करत आहे पालन

लग्नसमारंभापासून कोणत्याही प्रकारचे कार्यक्रमात गर्दी होतील या उद्देशाने रद्द करण्यात येत आहे. एकंदरीतच गर्दी होऊ नये यासाठी सर्वतोपरी सगळ्या पातळीवर काळजी घेतली जात आहे. अगदी हातावर पोट असणारा सामान्य माणूस देखील स्वतःच्या रोजगाराची पर्वा न करता या नियमांचे काटेकोरपणे पालन करत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सेलिब्रिटी म्हणून गायिका कनिका कपूर हिचे वागणे हे अत्यंत बेजबाबदारपणाचे आहे. तिने लंडनहून परतल्यानंतर स्वतःला समाजामध्ये असलेली भीती लक्षात घेता स्वतःला होम क्वोरंटाइन करण्याची गरज असताना देखील चक्क घराबाहेर पडून तिने पार्टी आयोजित केली. त्या पार्टीमध्ये कित्येक नामवंत व्हीआयपी लोक सहभागी होते, असे राज राजपूरकर म्हणाले.

कठोर कारवाई होणे हे अत्यंत गरजेचे

एकीकडे देश करोनासारख्या रोगाबरोबर लढतो आहे. तर दुसरीकडे कनिका कपूरसारखी व्यक्ती या सगळ्या नियमांची पायमल्ली करत त्या ठिकाणी अशा प्रकारचे कार्यक्रम करते हे अत्यंत शरमेची बाब आहे. माणुसकीला काळीमा फासणारी बाब आहे. खरं तर या पार्टीमध्ये सहभागी झालेल्या पाचशे व्हीआयपी लोकांच्या बाबतीत आहे आणि ते पाचशे लोक त्या त्या दिवसापासून कोणाच्या संपर्कामध्ये आले. हा एक खूप मोठा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतोय. त्यामुळे याबाबतीत कुठेतरी ताबडतोब दिल्ली आणि केंद्र सरकारने अत्यंत जबाबदारीने पावले उचलण्याचा काम करायला हवे. ज्या लढ्याला देशाचे प्रधानमंत्री राज्याचे मुख्यमंत्री एकत्रित येऊन लढण्यासाठी तयार आहेत. त्या लढ्याला यशस्वी करण्यासाठी अशा लोकांना मात्र समाजापासून दूर ठेवण्याचे काम केले गेले पाहिजे. त्यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई होणे हे अत्यंत गरजेचे आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राज राजपूरकर म्हणाले.


हेही वाचा – करोनाग्रस्त गायिकेच्या संपर्कातील राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार ‘क्वारंटाईन’


 

First Published on: March 20, 2020 7:08 PM
Exit mobile version